

उत्तर महाराष्ट्र थेट पूर्व भारताशी रेल्वेने जोडला जाणार
नाशिक व जळगावहून दार्जिलिंगचा थेट प्रवास शक्य
अलिपूरद्वार–मुंबई (पनवेल) अमृत भारत एक्सप्रेस सुरू
देशातील पर्यटन वाढावे, देशातील शहारांची कनेक्टीव्हिटी वाढावी यासाठी रेल्वे सुविधा आणल्या जात आहेत. आता महाराष्ट्रातील नाशिक ते थेट दार्जिलिंग अशी रेल्वे सेवा सुरु होणार आहे. त्यामुळे नाशिक आणि जळगावरून तुम्ही थेट दार्जिलिंग गाठू शकणार आहात. पूर्व भारताशी (उत्तर बंगाल) उत्तर महाराष्ट्राला जोडणारी नवीन अलिपूरद्वार-मुंबई (पनवेल) अमृत भारत एक्स्प्रेस सुरू झालीय. हा मार्ग अनेक प्रसिद्ध पर्यटनस्थळांना जोडणारा असून त्याचा महाराष्ट्रातील नाशिक, जळगावसह ठाणे आणि रायगड जिल्ह्यांला फायदा होईल.
भारत-भूतान आंतरराष्ट्रीय सीमेजवळ असलेल्या अलिपूरद्वार येथून सुरू होणारी ही सेवा अनेक कारणांमुळे महत्वाची ठरणार आहे. पूर्व भारत आणि पश्चिम किनारपट्टी यांच्यात ही सेवा महत्त्वाची ठरेल. दरम्यान एका संवेदनशील सीमावर्ती भागातील वाहतूक सुलभ करत अनेक राज्यांमध्ये पूर्व-पश्चिम राष्ट्रीय कनेक्टिव्हिटी मजबूत होणार असल्याचे रेल्वे मंत्रालयाने म्हटलंय. रेल्वेचा मार्ग उत्तर बंगालच्या सीमाभागाला उत्तर महाराष्ट्र, मुंबई प्रदेशाशी जोडणारा एक महत्वाचा पूर्व-पश्चिम रेल्वे कॉरिडॉर आहे. यातून पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र ही पाच राज्ये जोडली जाणार आहेत.
दरम्यान नाशिक ते अलिपूरद्वारला जाणारी ट्रेन अमृत भारत एक्सप्रेस साप्ताहिक सेवा म्हणून धावेल. अलिपूरद्वार-मुंबई (पनवेल) अमृत भारत एक्सप्रेस अलिपूरद्वार येथून गुरुवारी सकाळी ४:४५ वाजता सुटेल. ही ट्रेन पनवेल येथे शनिवारी सायंकाळी ५:३० वाजता पोहोचेल. पनवेल-अलिपूरद्वार अमृत भारत एक्सप्रेस पनवेल येथून सोमवारी सकाळी ११:५० वाजता सुटेल आणि बुधवारी दुपारी १:५० वाजता अलिपूरद्वार गाठेल.
दरम्यान ही अमृत ट्रेन महाराष्ट्रात कल्याण, नाशिकरोड, जळगाव आणि भुसावळ या ठिकाणी थांबेल. हा मार्ग अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळांनाही जोडणारा आहे. यात चहाच्या मळ्यांसाठी आणि हिमालयीन दृश्यांसाठी प्रसिद्ध असलेलं दार्जिलिंग, एक प्राचीन बौद्ध शिक्षण केंद्र असलेले विक्रमशिला महाविहार, बिहार सर्किटवर जवळच असलेले महाबोधी मंदिर, देशातील सर्वात पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक असलेला त्रिवेणी संगम, रामायणाशी संबंधित असलेले चित्रकूट धाम आणि भगवान शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर मंदिर भेट घडणार आहे.
म्हणजेच काय ज्या लोकांना चहाचे मळे बघायचे आहेत, आणि ज्यांना त्र्यंबकेश्वरचं दर्शन घ्यायचं आहे, त्या लोकांसाठी ही अमृत भारत एक्सप्रेस भारी असणार आहे. दरम्यान या रेल्वेमुळे पर्यटनाला चालना मिळेल. महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांना अमृत भारत ट्रेनचा फायदा होणार आहे. देशात ३० अमृत भारत एक्स्प्रेस गाड्या कार्यरत असून त्यात नवीन सेवा जोडल्या गेल्यामुळे देशभरात सेवांचा विस्तार झालाय. अमृत भारत गाड्या पूर्णपणे नॉनएसी अर्थात वातानुरहित आहेत. यात ११ सामान्य डबे, आठ शयनयान आणि एक पॅट्री कार अर्थात खानपान सेवा आणि दोन द्वितीय श्रेणी व साहित्य डब्यांचा समावेश असतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.