रोहित शर्मा, विराट कोहलीबाबत मोठी भविष्यवाणी
२०२७ चा वनडे वर्ल्डकप खेळणार का?
ऑस्ट्रेलियाची वनडे मालिका ठरणार शेवटची?
माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी काय संकेत दिले?
छे, यार...रोहित शर्मा, विराट कोहली नाय तर मग मज्जाच नाय! मी तर आता टीम इंडियाच्या मॅच बघणं सोडून दिलंय, अशी चर्चा, संवाद सध्या क्रिकेटचं वेड असलेल्या आणि भारतीय संघावर निस्वार्थ प्रेम करणाऱ्या, तसंच 'रो-को वेड्या' तरूण मुलांमध्ये सुरू असल्याचं दिसतंय. या दोन दिग्गज खेळाडूंनी खरंच ज्याला क्रिकेट आवडतो, त्यांना आपल्या देखण्या फलंदाजीनं वेड लावलंय. रेकॉर्ड तरी किती? मैदानावर उतरले की रेकॉर्ड...वेड तर लागणारच ना! पण या दोघांवर वेड्यासारखं प्रेम करणारे सध्या निराश आहेत. त्यांचं मन खट्टू झालंय. कसोटी नाही, टी २० नाही, किमान आता वनडेमध्ये तरी रोहित कॅप्टन असायला हवा होता, असं फॅन्सला मनापासून वाटतंय. मात्र, आता या फॅन्ससाठी थोडे वाईट संकेत आहेत. कारण ऑस्ट्रेलियाचा हा दौरा कदाचित शेवटचा असेल आणि २०२७ च्या वनडे वर्ल्डकपमध्ये हे दोघेही दिग्गज खेळणार नाहीत, असे संकेत माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दिले आहेत.
टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली या दोघांना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी संघात स्थान मिळालं आहे. हे दोघे संघात असले तरी, शुभमन गिल हा कर्णधार असेल. आता ही वनडे मालिका या दोघांची शेवटची असू शकते, असे अंदाज बांधले जात आहेत. किमान तशी चर्चा तरी सुरू आहे. २०२७ चा वर्ल्डकप हे दोघेही खेळणार नाहीत, असेही बोलले जाते.
भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही याबाबत संकेत दिले आहेत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणं घडलं नाही, तर कदाचित ही मालिका रोहित आणि विराटची शेवटची असू शकते आणि ते २०२७ चा वर्ल्डकप खेळू शकणार नाहीत, असेच यातून निष्कर्ष काढले जात आहेत. २०२७ च्या वर्ल्डकप संघात जर रोहित आणि विराटला स्थान मिळवायचं असेल तर या मालिकेत सर्वश्रेष्ठ कामगिरी करावी लागेल, अशी शास्त्रींची अपेक्षा आहे.
भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा होणार आहे. १९ तारखेपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होईल. यानंतर दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड या दोन संघांविरुद्ध एकदिवसीय मालिका होणार आहे. इंग्लंडविरुद्धही वनडे मालिका खेळवण्यात येणार आहे, पण तिला अजून अवकाश आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियामध्ये या दोघांची निवड झाली आहे. हे दोघे वनडे वर्ल्डकपसाठी भारतीय संघात असतील का, असा प्रश्न जो तमाम भारतीय क्रिकेट चाहत्यांना पडलाय, त्याचं उत्तर काही प्रमाणात रवी शास्त्रींनी देण्याचा प्रयत्न केला आहे. पुढचा वर्ल्डकप खेळण्याबाबत अनिश्चितता आहे, असे संकेत देतानाच, दोघांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत जबरदस्त कामगिरी केली तर, त्यांना वर्ल्डकप संघात संधी मिळू शकते, अशी आशाही व्यक्त केली आहे. सिडनीमध्ये पत्रकारांशी ते बोलत होते.
दोघांचा फिटनेस, त्यांची धावांची भूक आणि अर्थात त्यांचा फॉर्म यावर सगळं काही अवलंबून आहे. त्यामुळं मला असं वाटतंय की ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत ते नेमकी कशी कामगिरी करतात ते पाहणं महत्वाचे ठरणार आहे, असे रवी शास्त्री म्हणाले. या मालिकेनंतर काय करायचं आहे, हे त्यांना चांगलंच ठाऊक आहे. हा निर्णय सर्वस्वी त्यांचा असेल, असे सांगून शास्त्रींनी एकप्रकारे त्यांच्या रिटायरमेंटबाबत संकेत दिले आहेत.
वर्ल्डकप स्पर्धेला अद्याप २ वर्षे किंवा त्यापेक्षा कमी कालावधी आहे. विराट कोहली आणि रोहित शर्माच्या फॉर्मबाबत जास्त काही सांगायला नको. या दोघांचे वय अनुक्रमे ३६ आणि ३८ वर्ष आहे. भारतीय निवड समितीकडं हीच मोठी चिंता आहे. कारण ते सध्या लाँग टर्म पर्याय शोधत आहेत, असंही शास्त्री म्हणाले. जेव्हा मोठ्या मॅच असतात, तेव्हा अनुभवाला काही पर्याय नसतो. अतिमहत्वाच्या सामन्यांत हे दिग्गज खेळाडूच धावून येतात. अलीकडच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपल्याला ते पाहायला मिळालं, याकडंही शास्त्रींनी लक्ष वेधलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.