रविवारी दुबईत झालेल्या आशिया कप 2025 च्या सुपर-4 सामन्यात भारत-पाकिस्तान यांच्यात रंगलेला सामना चांगलाच गाजला. भारतीय टीमने या स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा पाकिस्तानला एकतर्फी लढतीत पराभूत करत मैदान गाजवलं. पाकिस्तानने भारतीय खेळाडूंना डिवचण्याचा प्रयत्न केला पण टीम इंडियाने त्यांना सडेतोड उत्तर दिलं.
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रऊफने सीमारेषेजवळ फिल्डींग करताना उकसवणारे इशारे केले आणि त्याने अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांच्याशी वाद घालण्याचाही प्रयत्न केला. मात्र भारतीय खेळाडूंनी शांत डोक्याने खेळ करून मैदानावर उत्तर दिलं.
पहिली फलंदाजी करताना पाकिस्तानने ५ विकेट्स गमावून १७१ रन्स केले. त्यानंतर भारताने केवळ ४ विकेट्सच्या मोबदल्यात १८.५ ओव्हरमध्ये लक्ष्य गाठलं. टीम इंडियाला चिथावणी देण्यासाठी पाकिस्तानी खेळाडूंनी केलेले प्रयत्न फोल ठरले.
शुभमन गिल आणि अभिषेक शर्माने भारताच्या विजयाची मजबूत पायाभरणी केली. सामन्यानंतर गिलने ‘X’वर चार शब्दांची पोस्ट लिहिली – “खेळ बोलतो, शब्द नाहीत”. त्याने सामन्याच्या काही फोटोंसह हा मेसेज शेअर केला आहे.
दोघांनी पहिल्या विकेटसाठी १०५ रन्सची पार्टनरशिप केली. अभिषेकने ३९ बॉलमध्ये ७४ रन्स केले. तर गिलने २८ बॉल्समध्ये ४७ रन्स केले. सामन्यानंतर अभिषेक शर्मानेही पाकिस्तानी खेळाडूंच्या निरर्थक भांडणावर प्रतिक्रिया दिली.
अभिषेक म्हणाला की, “आज त्यांच्या गोलंदाजांनी काहीही कारण नसताना आमच्याकडे येऊन वाद घालण्याचा प्रयत्न केला, ते मला अजिबात आवडलं नाही. म्हणून मी ठरवलं की याला मैदानावरच उत्तर द्यायचं. माझा उद्देश टीमसाठी चांगली कामगिरी करणं हाच होता.”
आशिया कप सुपर-4 मध्ये पाकिस्तानला हरवल्यानंतर आता टीम इंडिया २४ सप्टेंबरला बांगलादेशविरुद्ध तर २६ सप्टेंबरला श्रीलंकेविरुद्ध दुबईत भिडणार आहे. सुपर-4 मधील सर्व सामने झाल्यावर अव्वल दोन संघ अंतिम फेरीत प्रवेश करतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.