Viral reaction video India vs Pakistan match : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी२० विश्वचषकात झालेल्या हाय-व्होल्टेज सामना श्रीलंकेतील कोलंबो येथे पार पडला. पाकिस्तानविरोधात भारताने पुन्हा एकदा बाजी मारत शेजाऱ्यांना पराभवाची धूळ चारली. टीम इंडियाविरोधात दारूण पराभव झाल्यानंतर पाकिस्तानातून संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत. चाहत्यांच्या संतापाचा आणि दुःखाचा बांध फुटला (pakistani fan crying) आहे. आर. प्रेमदासा स्टेडियममधील एका पाकिस्तानी चाहत्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. पाकिस्तानच्या पराभवानंतर तो ढसाढसा रडत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. या कट्टर चाहत्याचा व्हिडिओ इंटरनेटवर वाऱ्यासारखा पसरला आहे. हा चाहता रडत रडत पाकिस्तानच्या संघाला पराभवाचा जाब विचारताना दिसत आहे. या चाहत्याच्या भावना आणि त्याने विचारलेले प्रश्न प्रत्येक क्रिकेट प्रेमीच्या काळजाला भिडणारे आहेत.
कोलंबोच्या मैदानातील भारताविरोधातील पराभव पाकिस्तानी चाहत्यांच्या जिव्हारी लागलाय. एका चाहत्याने रडत आपला संताप व्यक्त केला. तो व्हिडिओत म्हणतोय: "प्रत्येक वेळी इतका त्रास का देतात? भारताकडूनच सारखं सारखं का हरता? आम्ही तुम्हाला इतकं प्रेम देतो, पण तुम्ही प्रत्येक वेळी आम्हाला दुःख देता. आमच्या प्रेमाचा तुम्ही मजाक उडवताय." हा व्हिडिओ वाऱ्यासारखा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पाकिस्तानी संघाने वारंवार केलेल्या सुमार कामगिरीमुळे चाहता प्रचंड उद्विग्न झाला होता. "प्रत्येक वेळी तुम्हाला भारताकडूनच का हरायचं असतं? प्रत्येक पाकिस्तानी नागरिकाला का त्रास देता? आम्ही तुमच्याकडून नेहमी आशा आणि अपेक्षा ठेवतो, पण तुम्ही प्रत्येक वेळी भारताकडून हरता... का?" असा सवाल चाहत्याने पाकिस्तानच्या संघाला विचारलाय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. पाहा व्हायरल होणारा व्हिडिओ....
श्रीलंकेतील कोलंबो येथे झालेल्या टी२० विश्वचषकातील हायव्होल्टेज सामन्यात भारताने पाकिस्तानचा दारूण पराभव केला. नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजीला आलेल्या भारताची सुरूवात निराशाजनक झाली. पण इशान किशन याने मैदानात तांडव घातला. इशान किशन याने फक्त ४० धावांत स्फोटक ७७ धावांची खेळी केली. या खेळीमध्ये ३ षटकात आणि १० चौकारांचा समावेश होता. कर्णधार सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि शिवम दुबे यांनी छोटेखानी खेळी करत संघाची धावसंख्या १७५ पर्यंत पोहचवली. १७६ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या संघाला पळता भुई थोडी झाली. पाकिस्तानचा संघ १२० धावांपर्यंतही पोहचू शकला नाही. जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या यांनी पावरप्लेमध्ये भेदक मारा केला. तर अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि वरूण चक्रवर्ती यांनी मधल्या षटकात पाकिस्तानचे कंबरडे मोडले. पाकिस्तानच्या एकाही फलंदाजाला ५० धावांपर्यंत मजल मारता आली नाही. भारताने हा सामना १६१ धावांनी जिंकला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.