India vs England semifinal match turning points : वानखेडेवर इंग्लंडचा ७ धावांनी पराभव करत भारतीय संघाने दिमाखात फायनलमध्ये प्रवेश केला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ७ विकेटच्या मोबदल्यात २५३ धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरदाखल इंग्लंडला ७ विकेटच्या मोबदल्यात २४६ धावांपर्यंत मजल मारता आली. ४२ चेंडूमध्ये ८९ धावांची वादळी फलंदाजी करणाऱ्या संजू सॅमसन याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. संजू सॅमसन यानं सलग दुसऱ्या सामन्यात मॅच विनिंग फलंदाजी केली. पण भारताच्या विजयाचे टर्निंग पाँइट काय आहेत? हे तुम्हाला माहितेय... ? संजू सॅमसन यानं वादळी खेळी केलीच. पण भारत फायनलमध्ये जाण्यासाठी खालील ५ टर्निंग पाईंट ठरलेत... जाणून घेऊयात... (India vs England Thriller: Five Key Moments That Took Team India to the Final)
हार्दिक पांड्या-तिलक वर्माची फटकेबाजी -
संजू सॅमसन यानं ८९ धावांची वादळी फलंदाजी करत टीम इंडियाला शानदार सुरूवात करून दिली. पण अखेरच्या षटकात हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा यांनी इंग्लंडच्या गोलंदाजांची कत्तल केली. दोघांच्या फटकेबाजीने भारतीय संघाची धावसंख्या २५३ पर्यंत पोहचली. हार्दिक पांड्याने १२ चेंडूमध्ये २७ धावांचं योगदान दिले. हार्दिक पांड्याने २२५ च्या स्ट्राईक रेटने ३ चौकार आणि २ षटकार ठोकले. तर तिलक वर्माने फक्त ७ चेंडूमध्ये ३०० च्या स्ट्राईक रेटने २१ धावांची खेळी केली. तिलक-हार्दिकच्या फिनिशिंग टचमुळे भारतीय संघाने डोंगराइतक्या धावा उभ्या केल्या.
अक्षर पटेल यानं अचूक टप्प्यावर गोलंदाजी केलीच. पण त्यापेक्षाही त्याने फिल्डिंगमध्ये अतिशय महत्त्वाचं योगदान दिले. अक्षर पटेल यानं धोकादायक हॅरी ब्रूक याचा अप्रितम झेल घेतला. ब्रूक विश्वचषकात खोऱ्याने धावा काढत होता. पण बुमरहाच्या गोलंदाजीवर अक्षर पटेल यानं अशक्य झेल घेतला. त्याशिवाय अखेरच्या षटकात विल जॅक्स फटकेबाजी करत होता. त्यावेळी अक्षर पटेल आणि शिवम दुबे यांनी फिल्डिंगमध्ये भागिदारी केली. विल जॅक्स याने अर्शदीपच्या चेंडूवर जोरदार फटका मारला. चेंडू सीमापार जाणार होता. पण अक्षर पटेल पुन्हा मध्ये आला.. त्याने अतिशय शानदारपणे झेल घेतला. आपला तोल जातोय असे वाटताच अक्षर पटेलने चेंडू शिवम दुबे याच्याकडे फेकला. दोघांची भागिदारीने इंग्लंड बॅकफूटवर फेकला गेला.
बुमराह-हार्दिकचा भेदक मारा -
डेथ ओव्हर्समध्ये हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह यांने भेदक मारा केला. इंग्लंडला विजयासाठी १८ चेंडूत ४५ धावांची गरज होती. जेकब बेथल आणि सॅम करण फटकेबाजी करत होते. एका षटकात सामना इंग्लंडच्या बाजूने जाईल, असे वाटत होते. पण जसप्रीत बुमराहने १८ व्या षटकात फक्त ६ धावा देत इंग्लंडवर दबाव वाढवला. तर १९ व्या षटकात हार्दिक पांड्याने फक्त ९ धावा देत भारताचा विजय निश्चित केला.
भारताच्या विजयात सॅम करन याचेही महत्त्वाचे योगदान आहे. गोलंदाजीत सॅम करन याला आपल्या लौकिकास साजेसा मारा करता आला नाही. सॅम करन याने ४ षटकात ५३ धावा खर्च केल्या. त्याला विकेटही घेता आली नाही. त्याशिवाय फलंदाजी करताना मोक्याच्या क्षणी फ्लॉप फलंदाजी केली, सॅम करन याने हाणामारीच्या षटकात १४ चेंडूत फक्त १८ धावांचेच योगदान दिले. हाच इंग्लंडच्या फंलदाजीत मोठा फरक राहिलाय.
हॅरी ब्रूक -
विश्वचषकात तुफान फॉर्मात असलेला इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूक याने चुकांचा पहाडा वाचला. फलंदाजीत फ्लॉप राहिलाच. पण त्याला नेतृत्वातही चूका केल्या. अखेरची ओव्हर विल जॅक्स याला दिली. हार्दिक पांड्याच्या समोर विल जॅक्स याला षटक देणं ही मोठी चूक ठरली. तर फिल्डिंगमध्येही हॅरी ब्रूक याने मार खाल्ला. हॅरी ब्रूक याने संजू सॅमसन १५ धावांवर असताना सोपा झेल सोडला. संजूने त्यानंतर ८९ धावांची शानदार खेळी केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.