आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा सुरु व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. ही स्पर्धा येत्या १ जूनपासून वेस्टइंडीज आणि अमेरिकेत रंगणार आहे. या स्पर्धेसाठी लवकरच भारतीय संघाची घोषणा केली जाणार आहे. संघ निवडण्यासाठीची बैठक येत्या ३० एप्रिल रोजी आयोजित केली जाऊ शकते.
गेल्या काही दिवसांपासून टी-२० वर्ल्डकपबाबत अनेक बातम्या समोर येत आहेत. माध्यमातील काही वृत्तांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, रोहित शर्मा, हेड कोच राहुल द्रविड आणि मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांची बैठक पार पडली. या बैठकीत संघाबाबत काही निर्णय घेण्यात आले आहेत. या वृत्तात असं म्हटलं गेलं होतं की, टी-२० वर्ल्डकपमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा डावाची सुरुवात करताना दिसून येणार आहे.
आता रोहित शर्माने मोठं वक्तव्य करत या सर्व अफवा असल्याचं म्हटलं आहे. रोहितने ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू अॅडम गिलख्रिस्ट आणि इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनसोबत झालेल्या चर्चेत म्हटले की, 'मी अजून कोणालाच भेटलो नाहीये. अजित आगरकर सध्या दुबईत आहे. ते सध्या गोल्फ खेळण्याचा आनंद घेताय. तर राहुल द्रविड आपल्या मुलासोबत खेळताना दिसून आले आहेत. ते मुंबईत होते.'
तसेच तो पुढे म्हणाला की,' खरं सांगु तर मी अजूनपर्यंत कोणालाच भेटलो नाहीये. जोपर्यंत तुम्ही मला ,राहुल द्रविडला किंवा बीसीसीआयच्या कुठल्याही व्यक्तिला कॅमेऱ्यासमोर पाहत नाही. तोपर्यंत सर्वकाही मुर्खपणाचं आहे.'
आगामी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेला येत्या १ जूनपासून प्रारंभ होणार आहे. ही स्पर्धा ३ टप्प्यात रंगणार आहे. ५-५ संघांना प्रत्येकी ४ गटात विभागलं जाणार आहे. प्रत्येक गटातून २ संघ सुपर ८ मध्ये प्रवेश करतील. त्यानंतर या ८ संघांना ४-४ च्या २ गटात विभागलं जाणार आहे. या ८ संघांपैकी प्रत्येकी २-२ संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करतील. सेमीफायनल जिंकणारे २ संघ जेतेपद जिंकण्यासाठी फायनलमध्ये प्रवेश करतील.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.