भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मंधाना हिनं जबरदस्त कामगिरी केली आहे. इंग्लंडविरुद्ध शनिवारी पहिल्या टी २० सामन्यात तुफानी शतक ठोकून इतिहास रचलाय. नॉटिंघमच्या ट्रेंट ब्रिज मैदानावर इंग्लंडची गोलंदाजी अक्षरशः फोडून काढली. अवघ्या ६२ चेंडूंमध्ये ११२ धावांची आतिषी खेळी केली. त्यात १५ चौकार आणि तीन षटकारांचा समावेश आहे.
इंग्लंड आणि भारत पुरूष संघांमध्ये कसोटी मालिका सुरू आहे. पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या संघानं भारताचा पराभव केला. भारतीय पुरुष क्रिकेट संघानं निराशाजनक सुरुवात केली असली तरी, महिला क्रिकेट संघानं इंग्लंडसारख्या बलाढ्य संघाला जबरदस्त दणका दिलाय. इंग्लंडविरुद्ध शनिवारी नॉटिंघमच्या ट्रेंट ब्रिज मैदानात पहिला टी २० सामना झाला. या सामन्यात मंधाना हिनं वेगवान शतक झळकावून इतिहास रचला आहे. २८ वर्षीय मंधानाची टी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे पहिलं शतक आहे. तिनं २०१३ मध्ये टी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. १२ वर्षांनी भारतीय संघाकडून या फॉरमॅटमधील शतकाचा दुष्काळ तिनं संपवलाय.
कसोटी, वनडे आणि टी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रकारात शतक ठोकणारी मंधाना ही अशी कामगिरी करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरलीय. कसोटीमध्ये दोन शतके, वनडेमध्ये तिनं ११ शतकं झळकावली आहेत. पहिल्या टी २० सामन्यात भारतीय संघाचं नेतृत्व करणाऱ्या मंधानानं नाणेफेक गमावली. इंग्लंडच्या कर्णधारानं भारताला प्रथम फलंदाजीचं निमंत्रण दिलं.
सलामीला उतरलेल्या मंधानानं संघाला चांगली सुरुवात करून दिली. तिने शेफाली वर्मासोबत (२० धावा) पहिल्या विकेटसाठी ७७ धावांची भागीदारी रचली. शेफाली नवव्या ओव्हरमध्ये बाद झाली. हरलीन देओलने २३ चेंडूंत ४३ धावा कुटल्या. दुसऱ्या विकेटसाठी ९४ धावांची भागीदारी केली.
इंग्लंडच्या लॉरेन बेलने फेकलेल्या १६ व्या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर चौकार खेचून शतक पूर्ण केलं. दुसरीकडे बेलने शेवटच्या बॉलवर हरलीनला तंबूत पाठवलं. विकेटकीपर ऋचा घोष हिनं निराशा केली. अवघ्या १२ धावा करून ती बाद झाली. जेमिमा रॉड्रिग्जला भोपळाही फोडता आला नाही. सोफी एक्लेस्टोननं अखेरच्या ओव्हरमध्ये मंधानाला बाद केलं. दिप्ती शर्मा हिने ७ धावा, तर अमनज्योत कौरने तीन धावा केल्या. भारताने निर्धारित २० ओव्हरमध्ये पाच विकेट गमावून २१० धावा केल्या. बेलने तीन विकेट घेतल्या. एम आर्लोटने एक विकेट घेतली.
भारतीय महिला संघानं टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यात तिसऱ्यांदा २०० हून अधिक धावा केल्या. २०२४ मध्ये डीवाय पाटील स्टेडियममध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध २१७ धावा केल्या होत्या. तर २०२४ मध्येच दांबुलामध्ये यूएईविरुद्ध २०१ धावा केल्या होत्या.
भारताचा दमदार विजय
भारतानं पहिली फलंदाजी करताना २१० धावांचा डोंगर उभा केला होता. तो पार करताना इंग्लंडच्या संघाची दमछाक झाली. इंग्लंडचा संघ पंधराव्या ओव्हरमध्येच अवघ्या ११३ धावांवर गारद झाला. भारतानं हा सामना ९७ धावांनी जिंकला. या विजयासह भारतीय संघानं पाच सामन्यांच्या टी २० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. शतकी खेळी करणारी स्मृती मंधाना ही प्लेअर ऑफ द मॅच ठरली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.