India vs Pakistan T20 World Cup match highlights : टी२० विश्वचषकात भारतीय संघाने पाकिस्तानचा ६१ धावांनी दारूण पराभव केला. विजयानंतर टीम इंडियाचे खेळाडू आनंदात होते. पण सामन्यानंतर हँडशेक करताना सूर्याकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांनी कुलदीप यादव याला झापल्याचे दिसते. कारण, हार्दिक पांड्याच्या गोंलदाजीवर कुलदीप यादव याच्याकडून सोपा झेल सुटला होता. महत्त्वाच्या सामन्यात फिल्डिंग खराब केल्यामुळे कर्णधारालाही राग अनावर झाला होता. कुलदीप आणि हार्दिक पांड्या यांनी कुलदीप यादव याला चांगलेच सुनावले. रिंकू सिंह याने मध्यस्थी करत वाद मिटवला. (Kuldeep Yadav dropped catch reaction video)
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात एक चूक महागात पडू शकते. सामना अत्यंत चुरशीच्या वळणावर असताना कुलदीप यादवकडून सीमारेषेवर एक सोपा झेल सुटला. चेंडू हवेत असताना सर्वांच्या नजरा कुलदीपवर होत्या, पण त्याच्या हातातून चेंडू निसटला. हे पाहताच कर्णधार सूर्यकुमार यादव प्रचंड संतापलेला दिसला. त्याने मैदानातच कुलदीपवर ओरडून आपली नाराजी व्यक्त केली. हा झेल सुटणे भारताला महागात पडू शकते, हे सूर्याच्या चेहऱ्यावरून दिसत होते.
फक्त सूर्यकुमारच नाही तर अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या देखील या प्रकारामुळे खूप रागात दिसला. हार्दिकच्या गोलंदाजीवर कुलदीपने झेल सोडला. निर्णायक क्षणाला सोपा झेल सोडल्यामुळे हार्दिक संतापला होता. हार्दिकने रागाने जमिनीवर हात मारला आणि आपली चिडचिड व्यक्त केली. क्षेत्ररक्षणात झालेली ही चूक हार्दिकला पचनी पडली नाही.
कुलदीप यादव, सूर्यकुमार यादव अन् हार्दिक पांड्याचा यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आहे. चाहत्यांमध्येही दोन गट पडल्याचे दिसले. काहींच्या मते, कुलदीपसारख्या अनुभवी खेळाडूकडून अशी चूक अपेक्षित नव्हती. तर काहींनी सूर्या आणि हार्दिकच्या अशा वागण्यावर टीका केली आहे. खेळाडूंकडून चुका होतात. अशा वेळी कर्णधाराने त्यांना धीर द्यायला हवा, असे मत अनेक चाहत्यांनी व्यक्त केले आहे.
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताच्या डावाची सुरुवात अडखळत झाली. पण इशान किशनने वादळी फलंदाजी करत सामन्याचे चित्र बदलले. इशान किशन याने फक्त ४० चेंडूंमध्ये ७७ धावांची जबरदस्त खेळी केली. या खेळीमध्ये १० चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. तिलक वर्माने २५ धावा करत मोलाची साथ दिली. कर्णधार सूर्यकुमार यादवने संयमी फलंदाजी करत ३२ धावा जोडल्या. तर शेवटच्या षटकांमध्ये शिवम दुबे (२७ धावा) आणि रिंकू सिंग (११ धावा नाबाद) यांनी वेगाने धावा कुटल्यामुळे भारताला २० षटकांत १७५ धावांपर्यंत मजल मारता आली.
१७६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या पाकिस्तानला भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच धक्के दिले. हार्दिक पंड्याने पहिल्याच षटकात विकेट घेत पाकिस्तानची दाणादाण उडवली. हार्दिक पांड्याने सामन्यात २ बळी घेतले. जसप्रीत बुमराहने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत २ महत्त्वाच्या फलंदाजांना तंबूत धाडले. फिरकीपटू अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती यांनीही प्रत्येकी २ बळी घेत पाकिस्तानच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. कुलदीप यादवने १ गडी बाद केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.