भारताचा ऑस्ट्रेलियावर मालिकाविजय
अखेरचा सामना पावसामुळं झाला रद्द
भारताने विदेशात २-१ ने मालिका जिंकली
अभिषेक शर्मा मालिकावीर
विश्वविजेता आणि नंतर आशिया चषक विजेत्या भारतीय संघाचा टी - २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दबदबा कायम आहे. विदेशात असो की मायदेशात टीम इंडिया 'किंग' असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. एकेकाळी क्रिकेटविश्वावर वर्चस्व असलेल्या बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाला सूर्यकुमारच्या नेतृत्वाखालील टीम इंडियानं त्यांच्याच देशात जाऊन पराभूत केलं आहे. अर्थात पावसानंही भारतीय संघाला साथ दिली. या मालिकेतील अखेरचा सामना पावसामुळं रद्द झाला असला तरी, भारतानं ही मालिका २-१ ने जिंकली.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील निर्णायक आणि अंतिम सामना आज, शनिवारी ब्रिस्बेन येथील गाबा मैदानावर सुरू होता. भारताची प्रथम फलंदाजी होती. सलामीवीर अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांनी धडाकेबाज सुरूवात केली. पण पावसामुळं हा सामना थांबवावा लागला. बराच वेळ पाऊस सुरूच असल्यानं अखेर हा सामना रद्द करावा लागला. पावसामुळं या मालिकेतील दोन सामने रद्द करावे लागले आहेत. भारतानं यासह पाच सामन्यांची मालिका २-१ ने जिंकली. ऑस्ट्रेलियात द्विपक्षीय टी २० मालिका विजयाची घोडदौड भारतानं सुरुच ठेवली आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी २० मालिकेतील पाचवा आणि अखेरचा सामना ब्रिस्बेनमध्ये सुरू होता. सामना सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिशेल मार्श यानं नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताकडून फलंदाजीला अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल ही जोडी आली. त्यांनी डावाची सुरुवात धडाक्यातच केली. पाचव्या षटकातच संघाच्या धावा ५० पार पोहोचल्या. अभिषेक शर्मानं १३ चेंडूंत नाबाद २३ धावा केल्या. तर शुभमन गिल यानं १६ चेंडूंमध्ये नाबाद २९ धावा केल्या.
भारतीय संघाच्या ४.५ षटकांत ५२ धावा झाल्या होत्या. त्याचवेळी पावसानं एन्ट्री केली. त्यामुळं खेळ थांबवण्यात आला. बराच वेळ झाला तरी पाऊस थांबला नाही. त्यामुळं हा सामना रद्द करण्यात आला. टीम इंडियानं या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली होती. पाचवा सामना रद्द झाल्यानंतर ही आघाडी कायम राहून भारतानं मालिका विजय मिळवला.
भारतीय संघानं याआधीचा चौथा सामना एकतर्फी जिंकला होता. ऑस्ट्रेलियासारख्या संघाला टी २० मध्ये ४८ धावांनी मात दिली होती. अष्टपैलू अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी जबरदस्त कामगिरी केली होती. पुढील वर्षी टी २० वर्ल्डकप होणार आहे. त्याआधी भारताची ही विदेशातील अखेरची टी २० मालिका होती. आता वर्ल्डकपआधी भारतीय संघाला आणखी दोन टी २० मालिका खेळायच्या आहेत. पण या दोन्हीही मालिका मायदेशातच आहेत. त्यामुळं परदेशातील या मालिकाविजयानं भारतीय संघाचं मनोधैर्य आणखी वाढेल, असे मानले जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.