आयपीएल स्पर्धा रंगतदार स्थितीत आली असताना आणि भारतीय क्रिकेट संघाची अफगाणिस्तान विरुद्ध कसोटी आणि वनडे मालिकेसाठी घोषणा झाली असतानाच, भारताचा स्टार अष्टपैलू विजय शंकर यानं अचानक निवृत्तीची घोषणा केली. याबाबत त्यानं स्वतःच्या सोशल मीडिया हँडलवर माहिती दिली. क्रिकेट फक्त एक खेळ नाही, तर माझं संपूर्ण आयुष्य होतं, असा भावुक संदेश त्याने पोस्टमधून दिला. विजय शंकर याने वयाच्या १० व्या वर्षापासून क्रिकेट खेळायला सुरुवात केली. २५ वर्षांच्या दीर्घ प्रवासानंतर नव्या संधी शोधण्यासाठी नव्या मार्गाने जाण्याचा निर्णय त्याने घेतला आहे.
देशासाठी खेळणं माझ्या आयुष्यातील सर्वात अभिमानास्पद आणि आनंदाच्या क्षणांमधील एक असेल. मी देशांतर्गत आणि आयपीएलमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या संधी शोधता येऊ शकते. यापुढील काळातही क्रिकेटशी कनेक्ट राहता येईल, असे त्याने पोस्टमध्ये म्हटले आहे. २०१९ मधील वनडे वर्ल्डकपमध्ये खेळणाऱ्या विजय शंकरने आपल्या कारकीर्दीतील खास क्षणांना उजाळा दिला. नागपुरात भारताच्या ५०० व्या वनडे सामन्यात गोलंदाजी केली. वर्ल्डकपच्या पहिल्याच षटकातील पहिल्याच चेंडूवर विकेट घेतला. हे क्षण माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहेत, असे विजय शंकरने सांगितले.
विजय शंकर याने बीसीसीआय, भारतीय संघ, तमिळनाडू क्रिकेट असोसिएशन, त्रिपुरा संघ तसेच आयपीएलमधील गुजरात टायटन्स, सनरायझर्स हैदराबाद, चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स या संघांचेही आभार मानले. यावेळी विजय शंकर याने आपल्या मनातील खंत बोलून दाखवली. क्रिकेट कारकीर्दीत टीका, ट्रोलिंग आणि तिरस्काराचा सामना करावा लागला. मात्र, प्रत्येक कठीण काळाचा सामना सकारात्मक विचाराने केला, असं तो म्हणाला.
मी खूप तिरस्कार आणि नकारात्मकता बघितली. पण मी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि पुढे जाण्याचा मार्ग स्वीकारला. जर हे मी केलं तर ते अन्य कोणीही करू शकतं. क्रिकेटने मला आयुष्य जगायला शिकवलं. क्रिकेटच माझं आयुष्य आहे, असं तो म्हणाला. प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ, फिजियो, ट्रेनर, मीडिया, मित्र-परिवार यांचेही त्याने विशेष आभार मानले.
३५ वर्षीय विजय शंकर यानं भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. तो १२ एकदिवसीय सामने, ९ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. वनडे आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत त्याने २२३ धावा केल्या. तर ४ विकेट्स घेतल्या. तर टी २० आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत त्याने ४३ धावा केल्या. तर पाच विकेटही घेतल्या. आयपीएल कारकीर्दीत एकूण ७८ सामन्यांत १२३३ सामने खेळला असून, ९ विकेट्सही घेतल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.