Asia Cup 2023 Team India: आशिया कप २०२३ सुपर -४ स्टेजमध्ये टीम इंडियाने पाकिस्ताननंतर श्रीलंकेचा पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने थेट फायनलमध्ये धडक मारली. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने श्रीलंकेसमोर विजयासाठी २१४ धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारताने दिलेलं आव्हान पार करताना श्रीलंकेचा संघ अवघ्या १७२ धावांवर ढेपाळला.
कुलदीप यादव हा भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने ४ गडी बाद करत श्रीलंकेला पराभवाच्या दाढेत ढकललं. दरम्यान, टीम इंडियाच्या श्रीलंकेविरुद्धच्या विजयाची ५ मोठी कारणं समोर आली आहे. जाणून घेऊयात थोडक्यात... (Latest Marathi News)
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या टीम इंडियाला (Team India) रोहित आणि शुभमन गिल यांनी चांगली सुरुवात करून दिली. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याप्रमाणेच या सामन्यातही कर्णधार रोहित शर्मा पहिल्याच षटकापासून श्रीलंकेच्या गोलंदाजांवर तुटून पडला. त्याने पावर प्लेमध्ये श्रीलंकेची चांगलीच धुलाई केली.
रोहित शर्मा आणि शुभमन गिल या दोघांमध्ये ११.१ ओव्हरमध्येच ८० रनची पार्टनरशीप झाली. रोहितने ४८ चेंडूत ५३ धावा कुटल्या. या खेळीत त्याने ७ चौकार आणि २ सणसणीत षटकार ठोकले. शुभमन गिलने त्याला चांगली साथ दिली. गिलने २५ चेंडूत १९ धावांची खेळी केली.
रोहित-गिलच्या पार्टनरशीपनंतर मात्र भारताची बॅटिंग गडगडली. विराट कोहली स्वस्तात माघारी परतला. बिनबाद ८० वरुन टीम इंडियाची (Sport News) अवस्था ३ बाद ९१ अशी झाली होती. मात्र, त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या इशान किशन आणि केएल राहुल यांनी टीम इंडियाचा डाव सावरला. दोघांनी मिळून चौथ्या विकेट्साठी ६३ धावांची भागीदारी केली. राहुलने ३९ तर इशानने ३३ धावा केल्या.
राहुल आणि किशन दोघेही बाद झाल्यानंतर टीम इंडियाने ठराविक अंतराने विकेट्स गमावल्या. पांड्या, जडेजा स्वस्तात माघारी परतले. एकवेळ भारतीय संघाचा डाव २०० धावांच्या आतच संपुष्टात येईल असं वाटत असताना अक्षर पटेल हा टीम इंडियासाठी देवदुताप्रमाणे धावून आला. त्याने शेवटच्या काही षटकात फटकेबाजी करत भारतीय संघाला २१३ धावांपर्यंत पोहचवले. अक्षरने २६ धावांची खेळी केली.
टीम इंडियाकडून २१४ धावांचं छोटेखानी आव्हान मिळाल्यानंतर श्रीलंकेचा संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला. टीम इंडिायला हा सामना जिंकण्यासाठी चांगल्या गोलंदाजीची गरज होती. जसप्रीत बुमराह आणि सिराजने पावर प्ले मध्येच श्रीलंकेला एकापाठोपाठ एक असे ३ धक्के दिले. तर कुलदीप यादवने मीडल ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी करत श्रीलंकेला बॅकफूटवर ढकललं.
भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची अवस्था बिकट झाली होती, पण सहाव्या क्रमांकावर आलेला धनंजय डिसिल्वा आणि आठव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेला दुनिथ वेल्लालागे यांनी श्रीलंकेला सावरला. दोघांनी मिळून अर्धशतकी भागीदारी करत संघाला विजयाजवळ नेलं. एकवेळ टीम इंडिया हा सामना गमावेल, असं वाटत असताना जडेजाने मोक्याच्या क्षणी ही जोडी फोडली.
धनंजय डिसिल्वा ४१ रनवर आऊट झाला. वेल्लालागे साथ देण्यासाठी मैदानात उतरलेल्या महेश तीक्ष्णाचा सूर्यकुमारने मीडऑनवर सुरेख झेल टिपला. हार्दिक पांड्याने स्लोवर बॉल टाकत तीक्ष्णाला फसवलं. हा टीम इंडियाच्या विजयाचा खरा टर्निंग पॉईंट मानला जातोय. दरम्यान, या विजयासह टीम इंडियाने थेट फायनलमध्ये धडक मारली आहे.
Edited by - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.