पहलगाम हल्ल्याच्या १४ दिवसानंतर भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानमधील ९ दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त केले. हा हल्ला करून भारताने पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलं आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. ज्यात शुभम द्विवेदी यांचाही समावेश होता. सिंदूर ऑपरेशननंतर शुभमच्या पत्नी ऐशान्या हिने समाजमाध्यमांना पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 'आज खऱ्या अर्थाने शुभमच्या आत्मयाला शांती मिळाली असेल. मला खात्री होती की पंतप्रधान मोदी सूड घेतील', अशी प्रतिक्रिया ऐशान्या हिने दिली.
एका वृत्तासंस्थेशी बोलताना ऐशान्या म्हणाली, 'ऑपरेशन सिंदूर या नावाचा उल्लेख ऐकतानाच मी रडू लागले. हे नाव माझ्यासारख्या त्या सर्व २६ महिलांच्या हृदयाला स्पर्शून गेले', असं म्हणत तिने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
'मंगळवारी रात्री आम्ही जागेच होतो. पहाटे २ वाजता बाबांच्या मोबाईलवर फोन आला की भारताने कारवाई केली आहे. मग आम्ही सर्वजण टीव्हीसमोर बसलो. ऑपरेशनचे नाव पाहून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले'. असंही ऐशान्या म्हणाली.
पंतप्रधान मोदींचे आभार
'माझ्या पतीच्या मृत्यूचा सूड घेतल्याबद्दल मी पंतप्रधान मोदींचे आभार मानू इच्छिते. आमचा त्यांच्यावर विश्वास होता, आणि त्यांनी ज्या पद्धतीने प्रतिसाद दिला त्याने आमचा विश्वास अजूनच दृढ झाला आहे. हीच माझ्या पतीला खरी श्रद्धांजली आहे', असं म्हणत ऐशान्याने पंतप्रधान मोदींचे आभार मानले.
तसेच त्या म्हणाल्या, 'या ऑपरेशनमध्ये सहभागी असलेल्या सर्व जवानांचे मी आभार मानते. आम्ही रात्रभर त्यांच्यासाठी प्रार्थना करत होतो. दहशतवाद कुठेही असला तरी संपायला हवा. आज आपण पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे ठिकाण उद्ध्वस्त करून दाखवून दिले आहे की आपण काहीही करू शकतो', असं म्हणत ऐशान्याने ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान मोदींचे आभार मानले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.