देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
पुढील २ ते ३ दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता
महाराष्ट्रात मध्य भागात पाऊस तर विदर्भात उष्णतेची लाट कायम
१५ राज्यांना उष्णतेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला
देशामध्ये सध्या उष्णतेचा भडका उडाला आहे. काही राज्यात कडाक्याचे ऊन तर काही राज्यांमध्ये पावसाने हाहाकार केला आहे. भारतीय हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, पुढील ७ दिवस उत्तर, वायव्य आणि मध्य भारतात उष्णतेची तीव्र लाट कायम राहण्याची शक्यता आहे. या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अशात उकाड्याने हैराण झालेल्यांसाठी आनंदाची बातमी आहे. हवामान विभागाने मान्सूनबाबत एक दिलासादायक माहिती दिली आहे. पुढील २ ते ३ दिवसांत मान्सून भारतीय किनारपट्टीवर म्हणजेच केरळच्या किनारपट्टीवर दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सूनसाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील २ ते ३ दिवसांत नैऋत्य मोसमी मान्सूनया नैऋत्य आणि आग्नेय अरबी समुद्राच्या उर्वरित भागांमध्ये, कोमोरिन परिसरात, नैऋत्य, आग्नेय आणि पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात आणि अंदमान समुद्रात पुढील वाटचालीसाठी परिस्थिती अनुकूल राहील. गेल्या २४ तासांत आसाम, मेघालय, लक्षद्वीप, अरुणाचल प्रदेश, अंदमान आणि निकोबार बेटे, केरळ, कर्नाटक आणि उत्तर कर्नाटकच्या काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे.
उत्तर भारतात प्रचंड उकाडा असताना ईशान्य आणि दक्षिण भारतातील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. गेल्या २४ तासांत आसाम आणि मेघालयमध्ये अतिवृष्टी झाली. किनारपट्टीवरील कर्नाटकातही मुसळधार ते अति मुसळधार पाऊस झाला. भारतीय हवामान विभागाने पुढील ४ ते ५ दिवसांसाठी केरळ, माहे, लक्षद्वीप, तामिळनाडू आणि ईशान्य भारतासाठी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
तर इकडे, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि राजस्थानमध्ये धुळीची वादळे आणि मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढच्या २ ते ३ दिवसांत नैऋत्य आणि आग्नेय समुद्र, अंदमान समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांमध्ये वाऱ्यांच्या प्रगतीवर मान्सूनची पुढील स्थिती अवलंबून आहे. पुढच्या २ ते ३ दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल होईल. त्यानंतर तो पुढे सरकरत महाराष्ट्रात पोहचेल.
आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, केरळ, लक्षद्वीप, तामिळनाडू, पुदुचेरी, कर्नाटक, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, सिक्कीम, झारखंड, ओडिशा, बिहार, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंदीगड, उत्तर प्रदेश, राजस्थान, गोवा आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये ३० मे पर्यंत हलका ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात काही राज्यात विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाचीही शक्यता आहे.
तर, पंजाब, हरियाणा, चंदीगड, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड, ओडिशा, बिहार, झारखंड, तेलंगणा, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश, यानम आणि पश्चिम बंगालमध्ये ३० मेपर्यंत तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. दिवसा वाहणारे उष्ण वारे आणि रात्रीची दमट हवा परिस्थिती आणखी बिघडवू शकते, असे हवामान खात्याने सांगितले. या राज्यातील नागरिकांनी दुपारच्या वेळी घराबाहेर पडू नये आणि काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.