पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा पराभव झाला आहे. तर भाजपनं एकहाती सत्ता मिळवली आहे. निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करताना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार नाही, अशी घोषणा केली. यामुळं राज्यात राजकीय पेच वाढला आहे. दुसरीकडे निवडणूक आयोगानं नवीन विधानसभा स्थापन करण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.
मी निवडणूक हरली नसून, मला हरवण्यात आले आहे. ईव्हीएममधून लूट केल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला असून, निवडणूक आयोगाला सर्वात मोठा खलनायक ठरवलं आहे. मी राजीनामा देणार नाही, असा आक्रमक पवित्रा ममता बॅनर्जींनी घेतला असल्यानं राजकीय पेच वाढला आहे. नवं सरकार स्थापन करण्यासाठी पर्यायांचा शोध घेतला जात आहे. दुसरीकडे निवडणूक आयोगाने महत्वाचं पाऊल टाकलं आहे. नवीन विधानसभा स्थापन करण्यासाठी निवडणूक आयोगाने अधिसूचना काढली आहे. ती पश्चिम बंगालच्या राज्यपालांकडे पाठवण्यात आली आहे. पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. निवडणूक आयोगानं उचललेल्या पावलामुळं नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राजीनामा देण्यास नकार दिला असून, त्यावर मुख्य निवडणूक अधिकारी मनोज कुमार अग्रवाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याच्याशी निवडणूक आयोगाचा काहीही संबंध नाही. मुख्यमंत्री, राज्यपाल आणि राष्ट्रपतींशी हा मुद्दा संबंधित आहे. आमची यात काही भूमिका राहिली नाही. यावर आम्ही काहीही टिप्पणी करू शकत नाही. आम्ही निवडणूक आयोगाने काढलेली अधिसूचना राज्यपालांकडे पाठवली आहे, असे अग्रवाल यांनी सांगितले.
निवडणूक आयोगाने काढलेल्या अधिसूचनेनंतर राज्यात नवीन सरकार स्थापन करण्याच्या हालचाली वाढल्या आहेत. राज्यात नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी ९ मे रोजी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याआधी ८ मे रोजी कोलकातामध्ये भाजपच्या विधीमंडळ पक्षाची बैठक होईल. त्यात पक्षाचे सर्व आमदार विधीमंडळ नेत्याची निवड करतील. त्यासाठी पक्षाने दोन निरीक्षकांची निवड केली असून, अमित शहा यांच्याकडे ती जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर ओडिशाचे मोहन चरण मांझी हे सहनिरीक्षक असतील.
सूत्रांच्या माहितीनुसार, विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत सुवेंदू अधिकारी यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. कारण बंगालच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत त्यांचे नाव आघाडीवर आहे. अधिकारी यांनी भवानीपूर मतदारसंघातून निवडणूक लढवली असून, त्यांनी ममता बॅनर्जी यांचा पराभव केला आहे. बंगालमध्ये निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी पदाचा राजीनामा देण्यास नकार दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.