पेपरफुटी आणि अनियमिततेविरोधात झारखंडमध्ये विद्यार्थ्यांचे तीव्र आंदोलन
आंदोलन १३व्या दिवशी पोहोचले असून सहा विद्यार्थी उच्चस्तरीय चौकशीच्या मागणी करत आहेत.
आंदोलकांनी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
झारखंडमध्ये JPSC सह विविध भरती परीक्षांमधील कथित अनियमितता आणि प्रश्नपत्रिका फुटण्याच्या घटनांविरोधातील आंदोलन सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा १३ वा दिवस आहे. पेपर फुटीच्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, या मागणीसाठी सहा जण बेमुदत उपोषण करत आहेत.
सरकारच्या उदासीनतेमुळे आणि मागण्यांची पूर्तता न झाल्यामुळे, आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आता मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. विद्यार्थ्यांचा असा आरोप आहे की, आपण चर्चेसाठी तयार असूनही राज्य सरकार त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देत नाहीये. मुख्यमंत्री हे त्यांच्या पदायोग्य नाहीत असं एका विद्यार्थ्याने म्हटलंय.
'झारखंड मुक्ती मोर्चा'चे प्रमुख आणि मुख्यमंत्री सोरेन यांनी राज्यपाल संतोष कुमार गंगवार यांची भेट घेतलीय. मुख्यमंत्र्यांनी JPSC भरती प्रक्रियेबाबत सुरू असलेल्या वादाची संपूर्ण माहिती राज्यपालांना दिलीय. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिलीय. त्याचदरम्यान मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची ही मागणी केली जातेय. तर दुसरीकडे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सरकारच्या निमंत्रणाला प्रतिसाद देत चर्चेसाठी तयारी दर्शवली आहे. सरकारकडे एक शिष्टमंडळ पाठवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आलाय.
रांचीमध्ये विद्यार्थ्यांची आंदोलन सुरू आहे. विद्यार्थ्यांनी हेमंत सोरेन यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून, या परिस्थितीकडे लक्ष देण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात 'एएनआय'शी (ANI) बोलताना आंदोलनकर्ते विद्यार्थी राहुल क्रांती म्हणाले, "आम्ही चर्चेसाठी तयार आहोत." आमची विनंती होती की, सरकारचं शिष्टमंडळ आंदोलनस्थळी यावे आणि त्यांनी चर्चा करावी.
दरम्यान सरकारनं कोणत्याच प्रकारची सकारात्मक भूमिका घेतली नाहीये. त्यामुळे आम्ही आमचं शिष्टमंडळ सरकारकडे पाठवणार आहोत. दरम्यान सरकारच्या दोन नेत्यांनी आंदोलनस्थळी जात सरकार सोबतच्या चर्चेसाठी आंदोलनकर्त्यांना निमंत्रण दिलं होतं. पाच सदस्यांचे शिष्टमंडळ सरकारसोबत चर्चेसाठी पाठवावे असं सांगण्यात आले आहे.
आणखी एका आंदोलनकर्त्याने 'एएनआय' (ANI) या वृत्तसंस्थेला सांगितले, "आम्ही आता मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहोत, कारण ते या पदासाठी अयोग्य आहेत. त्यांना बेंगळुरूहून परत येऊन बराच काळ लोटला आहे, तरीही त्यांनी परिस्थितीकडे अजिबात लक्ष दिलेले नाही."
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.