IIT पवईत विद्यार्थ्याची आत्महत्या, साहिलला छळ करून मारल्याचा आईचा आरोप

IIT Powai Student Endlife: IIT पवईत विद्यार्थ्यानं आत्महत्या केलीय... मात्र विद्यार्थ्यांच्या आत्महत्येमागील नेमकं कारण काय? आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याच्या आईनं IIT प्रशासनावर काय आरोप केलाय?
IIT Bombay student Sahil Wakode
IIT Bombay student Sahil Wakodesaam tv
Published On

आयआयटी मुंबईच्या एनर्जी सायन्स अँड इंजिनियरिंग विभागात दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या साहिल वाकोडे या विद्यार्थ्यानं वसतिगृहातील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय...परीक्षेदरम्यान मोबाईलचा वापर करून कॉ़पी केल्याचा आरोप झाल्यानंतर साहिलनं हे टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त होत आहे..मात्र नेमकं प्रकरण काय...पाहूयात..

IIT पवईत नेमकं काय घडलं?

IIT पवईमध्ये मिड-सेमिस्टर परीक्षा सुरू आहेत.

18 सप्टेंबर 2026

परीक्षेदरम्यान साहिल नावाच्या विद्यार्थ्यानं मोबाईल फोनचा वापर केला

परीक्षेतील प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी साहिलनं चॅटजीपीटीचा वापर केल्याचा आरोप होता

कॉपी पकडल्यानंतर शिक्षक आणि विभाग प्रमुखांनी साहिलचं समुपदेशन केलं

शैक्षणिक कारकिर्दीवर या घटनेचा विपरित परिणाम होणार नाही, अशी हमी साहिलला प्रशासनानं दिली

मात्र 18 सप्टेंबरलाच सायंकाळी 7 वाजता साहिलचा मृतदेह खोलीत आढळला

साहिल मूळचा यवतमाळ येथील रहिवासी असून मागील वर्षीच IIT मुंबईत त्याने प्रवेश घेतला होता... अशात त्याच्यासोबत घडलेल्या प्रकरानंतर विद्य़ार्थ्यांनी IIT मुंबईच्या मॅनेजमेंटवर गंभीर आरोप करत ठिय्या आंदोलन केलं.... संस्थेचे संचालक प्रा. शिरीष केदारे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र विद्यार्थी मागण्यावर ठाम होते. तर साहिलच्या आई-वडिलांनीही थेट IIT गाठत सकाळी कॅम्पसमध्ये ठिय्या आंदोलन करत प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह स्वीकारणार नसल्याची भूमिका घेतली. यावेळी साहिलच्या आईनं गंभीर आरोप केले.

तर दुसरीकडे आगामी परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला. विद्यार्थ्यांनी संस्थेचे डीन आणि संचालक यांचा राजीनाम्याची मागणी केली आहे... यावेळी विद्य़ार्थ्य़ांनी कोणत्या तक्रारी मांडल्या पाहूयात...

IIT मॅनेजमेंटविरोधात विद्यार्थ्यांच्या तक्रारी

'सुट्ट्यांच्या दिवशी परीक्षा घेतल्या जातात'

'एकाच दिवशी 2 पेपर घेतले जातात'

'मानसोपचार तज्ज्ञांची संख्या अपुरी'

'मेसच्या कारभारावरून अनेक तक्रारी'

'अभ्यासासाठी लायब्ररीत पुरेशी व्यवस्था नाही'

'विद्यार्थ्यांचं मानसिक खच्चीकरण, छळ होतो'

दुसरीकडे साहिलसोबत जातीयवाद झाल्याचा आरोप काही विद्यार्थ्य़ांनी केलाय...

तर दुसरीकडे साहिलच्या आई-वडीलांनीही याप्रकरणात ठोस भूमिका घेतल्यानं पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून घ्यावा लागला.

आता पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि साहिलचा मोबाईल जप्त करण्यात आलाय...पोलिसांच्या तपासानंतर साहिलच्या मृत्यूमागील सत्य समोर येईलच...

मात्र देशातील सर्वोच्च शिक्षण संस्था मानल्या जाणाऱ्या आयआयटी मुंबईमधील या घटनेने विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा आणि उच्च शिक्षण संस्थांमधील तणावाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com