रोहित कदम, साम प्रतिनिधी
आखाती युद्धात पाकिस्तान आता पूरता भरडला गेलाय. ऊर्जासंकट आणि इंधनाच्या टंचाईनं कंगाल पाकिस्तानवर मोठी नामुष्की ओढावलीय. शाहबाज सरकारनं ऊर्जा बचतीच्या नावाखाली आपली अब्रु वाचवण्यासाठी एक अजब फतवा काढलाय. खैबर पख्तुनख्वा, पंजाब, बलुचिस्तान, इस्लामाबाद, गिलगिट-बाल्टिस्तान आणि पीओकेमधील बाजारपेठा आणि शॉपिंग मॉल्स रात्री 8 वाजताच बंद होणार आहेत.तर बेकरी, रेस्टॉरंट, तंदूर आणि खाद्यपदार्थांची दुकाने रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.
विवाह सोहळ्यांसाठी वापरले जाणारे हॉल आणि इतर ठिकाणं देखील रात्री 10 वाजेपर्यंत बंद होतील. खाजगी घरे किंवा मालमत्तांमध्ये रात्री 10 नंतर होणारे विवाह सोहळे बंद राहणार आहेत. मात्र औषधांची दुकाने आणि फार्मसींवर कुठल्याही प्रकारची वेळची अट नाही. पाक पंतप्रधानांनी हा नवीन नियम 7 एप्रिलला रात्री 8 वाजल्यापासून लागू होणार आहे. त्यामुळे कंगाल पाकिस्तानची वाटचाल लॉकडाऊनच्या दिशेने सुरु आहे.
दरम्यान "युद्ध आखातात सुरु असूनही पण त्याचा आर्थिक बोजा आमच्या खिशावर पडतोय, अशी भावना पाकिस्तानी नागरिक व्यक्त करतायत. त्यामुळे तेलाच्या किमतीत वाढ झाल्यानं युद्ध लढणाऱ्या इराण पेक्षा पाकिस्तानची अवस्था दयनीय झालीये. पाकमध्ये महागाईनं जागतिक विक्रम केलाय. अन्नधान्यांच्या किमती आवाक्याबाहेर गेल्यात. पाकिस्तानमधील महागाई वार्षिक 7.3 टक्क्यांपर्यंत वाढलीये. अशावेळी आधीच कर्जाचा वाढता बोझा आणि त्यात महागाईचा भडका यामुळे कंगाल पकिस्तानची अवस्था आगीतून फुफाट्यात पडल्यासारखीच झाली आहे.