Godavari Claims Lives: पुण्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्यामुळे चार जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. रविवारची ही घटना ताजी असतानाच आता गोदावरी नदी पात्रात पाच जणांचा मृत्यू झाल्याचेही समोर आले आहे. दर्शनाआधी गोदावरी नदीपात्रात अंघोळीसाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तरुण हैदराबादच्या चिंतल भागात राहणारे आणि मूळचे राजस्थानचे रहिवासी होते.
नांदेड जिल्ह्यालगत असलेल्या तेलंगणातील श्री सरस्वती देवी मंदिर, बासर येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे. हैदराबादमधील चिंतल बाजार येथील एकाच कुटुंबातील १८ जण दर्शनासाठी आले होते. दर्शनाआधी गोदावरी नदीत स्नानासाठी उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्याने त्यातील ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तेलंगाणा येथील निर्मल जिल्ह्यातील ही घटना समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
मंदिरात दर्शनापूर्वी एकाच कुटुंबातील १८ जण गोदावरी नदीत अनुष्ठानासाठी गेले. यावेळी ते नकळत खोल पाण्यात गेले आणि बुडू लागले. प्रत्यक्षदर्शींनुसार, तरुणांना पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही. कुटुंबातील इतर सदस्यांनी आरडाओरड केली. स्थानिकांनी बुडणाऱ्यांना वाचवण्याचे प्रयत्न केले, पण ते यशस्वी झाले नाहीत. ५ जणांचा मृत्यू झाला तर १३ जणांचा वाचवण्यात आले.
मृतांची नावे राकेश, विनोद, मदन, रुतिक आणि भरत अशी आहेत. या सर्वांचं वय 20 वर्षांपेक्षा कमी आहे. सर्व मृतदेह सरकारी रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले. गेल्या काही दिवसात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीत पाण्याचा प्रवाह वाढला आहे. गोदावरी नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पाच जणांचा मृत्यू झाला.
तेलंगानाचे परिवहन आणि मागासवर्ग कल्याण मंत्री पोन्नम प्रभाकर यांनी या घटनेवर दुख: व्यक्त केले. त्यांनी पाच तरुणांच्या मृत्यूमुळे शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केल्या. नद्या आणि सिंचन प्रकल्पांना भेट देणाऱ्यांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.