Eknath Shinde Gujarati speech in Vadnagar : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या गुजराती भाषेतील भाषणावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार निशाणा साधला आहे.
शिंदे गटाचे मुख्यालय गुजरातमध्ये आहे, त्यामुळे आपल्या गुजराती नेत्यांना खूश करण्यासाठी शिंदे गुजरातीत बोलले असतील. ते आता सुरतमध्ये शिवसेना भवन बांधत आहेत, असा घणाघाती टोला राऊत यांनी लगावला. तसेच, मराठी बोलल्याने नेतृत्व उजळत नाही असे वाटणे हा छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान असल्याचे सांगत त्यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
शिंदे गटाचे पक्ष मुख्यालय जसे आमचे शिवसेना भवन किंवा मातोश्री आहे, तसे त्यांचे मुख्यालय गुजरातमध्ये आहे आणि पक्षाचे प्रमुख गुजराती आहेत. त्यामुळे आपल्या गुजराती नेत्यांना खूश करण्यासाठी शिंदे गुजरातीत बोलले असतील, असा टोला राऊत यांनी लगावला. पुढे बोलताना राऊत म्हणाले की, नरेंद्र मोदींना एकनाथ शिंदेंपेक्षाही उत्तम मराठी बोलते येते. मात्र, केवळ गुजराती नेत्यांची मनधरणी करण्यासाठीच हे सर्व सुरू आहे. मराठी बोलल्याने नेतृत्व उजळत नाही असे जर कोणाला वाटत असेल, तर हा थेट छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान आहे. मला तर असे कळले आहे की ते आता सुरतमध्ये शिवसेना भवन बांधत आहेत; पण ते बांधून पूर्ण होईपर्यंत शिवसेना त्यांच्या हातात उरणार नाही, असा घणाघाती दावा त्यांनी केला.
या वेळी बोलताना राऊत यांनी तृणमूल काँग्रेसचे (TMC) चिन्ह आयोगाने गोठवले, त्यावर घणाघाती टीका केली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यावरूनच भाजप आणि निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला होता. राहुल गांधी म्हणाले होते की, आधी शिवसेना, मग राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस... भाजप विरोधी पक्ष संपवण्यासाठी सत्ता, पक्ष आणि चिन्ह चोरी करत आहे' असा हल्लाबोल केला होता. या वक्तव्याचा दाखला देत राऊत म्हणाले, "मूळ पक्ष हा ममता बॅनर्जी यांचाच आहे. ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांच्याकडून पक्ष आणि चिन्ह हिरावून घेणे हा निवडणूक आयोगाचा सर्वात मोठा घोटाळा आहे. अमित शाह यांच्या दबावाखाली निवडणूक आयोग काम करत आहे. विरोधकांचे पक्ष चोरांच्या हातात देऊन देशातील लोकशाही धोक्यात आणली जात आहे.
तसेच सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीवर बोलताना राऊत म्हणाले की, काल न्यायाधीशांनी मूळ पक्षाचे अस्तित्व टिकून राहणे गरजेचे असल्याचे विधान केले आहे. धनुष्यबाण हे चिन्ह गोठवून ते फुटीर गटाला देणे हा शेकडो कोटींचा घोटाळा होता. मात्र, आता सत्य हळूहळू बाहेर येत असून आगामी काळात याचे वेगळे परिणाम देशाच्या राजकारणावर दिसतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.