मुंबई : राज्यात स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) सरकारविरोधात शिवसेना (Shivsena) सातत्याने शाब्दिक हल्ले करत आहे. एकनाथ शिंदे आणि यांनी भाजसोबत एकत्र येऊन स्थापन केलेलं सरकार हे उधारीचं सरकार आहे अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) महाराष्ट्राला बुलेट ट्रेन देतील, ‘ईडी’च्या चौकशा बंद करतील. त्या बदल्यात फक्त मुंबईसह महाराष्ट्राचे तीन तुकडे शिंदे-फडणवीसांकडून करून घेतील. अशी टीकाही सामनातून करण्यात आली आहे. (Shivsena Latest News)
Nupur Sharma : नुपूर शर्मा यांना जीवे मारण्याची धमकी; सलमान चिश्ती पोलिसांच्या ताब्यात'शिंदेंचं भावूक होणं हे नाटक होतं'
शिंदेंनी भाषणादरम्यान रात्रीच्या भेटीगाठींबद्दल केलेल्या उल्लेखावरुन शिवसेनेनं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख ‘नाईट किंग’ असा केला आहे. तसेच शिंदे यांचं विधानसभेमध्ये भाषणादरम्यान भावूक होणं हे नाटक होतं, पक्ष सोडताना त्या सर्व प्रकारास नैतिकतेचे अधिष्ठान प्राप्त व्हावे म्हणून नारायण राणे, छगन भुजबळ वगैरे नेते जसे भावुक झाले होते, तोच आव मुख्यमंत्री शिंदे यांनी आणला. ते हेलावले, अस्वस्थ झाले. त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. असे बरेच नाट्य घडले. राणे, भुजबळांनी विधानसभेत हेच संगीत नाटक केले होते. त्यापेक्षा शिंदे यांचे नाट्य वेगळे नव्हते'. असा टोलाही शिवसेनेनं लगावला आहे.
'पळून गेलेले आमदार पुन्हा निवडून कसे येतात ते पाहू.'
'फुटीर गटाचे नेते व मुख्यमंत्री श्री. शिंदे सांगतात, ‘‘त्यांच्याबरोबर गेलेल्या पन्नासेक आमदारांपैकी एकाचाही पराभव होणार नाही.’’ हा महाराष्ट्राच्या सुज्ञ जनतेवर दाखविलेला अविश्वास म्हणावा की, जसे आमदार विकत घेता येतात तसे मतदारांनाही विकत घेऊ याबाबतचा आत्मविश्वास? त्याच वेळी श्री. आदित्य ठाकरे यांनी आव्हान स्वीकारून सांगितले आहे की, ‘‘पळून गेलेले आमदार पुन्हा निवडून कसे येतात ते पाहू.' असं आव्हान देखील सामनातून शिंदेंना देण्यात आलं आहे. (Eknath Shinde Latest News)
'नशीब विरोधकांचे की...,'
'महाराष्ट्रात शिंद्यांचे सरकार आले व पंतप्रधान मोदी यांनी वचन दिले की, ‘महाराष्ट्राला काहीच कमी पडू दिले जाणार नाही.’ दिल्लीचे सरकार राज्यातून शिवसेनेचा मुख्यमंत्री जाण्यासाठी पाण्यात देव घालून बसले होते. राज्य गेल्याशिवाय महाराष्ट्राला त्याचे हक्क द्यायचे नाहीत असे जणू त्यांनी ठरवूनच टाकले होते. शिंदे व फडणवीस यांच्या सरकारला हवे ते देऊ. त्या बदल्यात ही जोडगोळी भाजपाला पुढच्या विधानसभेत दोनशे जागा मिळवून देणार आहे. नशीब विरोधकांचे की, त्यांनी 288 जागांचा वायदा केला नाही,' अशी टीकाही सामनातून करण्यात आली.
'ते बुलेट ट्रेन देतील, ‘ईडी’च्या चौकशा बंद करतील, पण...'
'शिंदे यांनी आज शिवसेना फोडून नवे राज्य आणले ते भाजपच्या मदतीने. ते त्यांनाच लखलाभ ठरो. शिंदे-फडणवीस यांच्या येण्याने महाराष्ट्राला सर्वकाही मिळेल. काहीच कमी पडू दिले जाणार नाही, असे पंतप्रधान मोदी सांगतात. ते बुलेट ट्रेन देतील, जीएसटीचा परतावा देतील, आरेतील जंगलतोड करू देतील, ‘ईडी’च्या चौकश्या बंद करतील. त्या बदल्यात फक्त मुंबईसह महाराष्ट्राचे तीन तुकडे शिंदे-फडणवीसांकडून करून घेतील. मराठी माणसाचे खच्चीकरण व महाराष्ट्राचा अवसानघात करतील, दुसरे काय होणार' असंही सामनाच्या अग्रलेखात मांडण्यात आलं आहे.
Edited By - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.