Mumbai News: समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या बस अपघातामध्ये (Bus Accident) 26 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या अपघातावरुन राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. या अपघातावरुन विरोधकांकडून सरकारवर (Shinde-Fadnavis Government) टीकेची झोड सुरु आहे. आता ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी या अपघातावरुन शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. 'समृद्धी महामार्ग अपघात प्रकरणी या सरकारविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करू नये?', असा संतप्त सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.
संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधत असताना समृद्धी महामार्गावरील अपघात प्रकरणी सरकारला चांगलेच धारेवर धरले. त्यांनी सांगितले की,'बस अपघातात 26 जणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी तुम्ही चालकाविरोधात गुन्हा दाखल करतात. आतापर्यंच छोट्या कार आणि आपल्या वाहनांमधून जी लोकं जात होती त्यांचे अपघात झाले याप्रकरणी तुम्ही कोणावर गुन्हा दाखल करत होता. मग सदोष मनुष्यवधाचे गुन्हे देवेंद्र फडणवीस स्वत:वर दाखल करुन घेतात का?', असा सवाल त्यांनी केला आहे.
'समृद्धी महामार्गावर १०० पेक्षा जास्त लोकांचा, अनेक कुटुंबाचा मृत्यू झाला आहे. मग या सरकारवर समृद्धी महामार्ग अपघात प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करु नये असा सवाल संजय राऊतांनी केला आहे. या आधी झालेल्या अपघाताची जबाबदारी कोण घेणार?', असा देखील सवाल त्यांनी केला आहे. तसंच,'संपूर्ण समृद्धी महामार्गाची पुन्हा एकदा एक तांत्रिक चाचणी घ्यावी. संपूर्ण महामार्गावरील अपघाताच्या जागा कुठे आहेत ? अपघात का होत आहेत? या मागचे कारण शोधले जावे.', असे त्यांनी सांगितले.
'फक्त त्याचं राजकीय भांडवल केलं जात आहे. आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, याच्या काळात झालं, त्याच्या काळात झालं यापेक्षा हे अपघात का होत आहेत हे पाहा. गेल्या काही महिन्यात या महामार्गावर 300 पेक्षा जास्त अपघात झालेले आहेत. यामध्ये 100 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे याचा आपण विचार केला पाहिजे. याची जबाबदारी कोण घेणार आहे?' असं देखील देखील त्यांनी सांगितले.
तसंच, 'हे सरकार जे प्रकल्प निर्माण करत आहेत ते फक्त ठेकेदारांची धन व्हावी यासाठीच. ठेकेदारांच्या माध्यमातून आपल्याकडे खोके यावेत म्हणून या प्रकल्पांची कामं काढली जात आहेत. विशेष तज्ज्ञांकडून माहिती घ्यावी, त्यांचा सल्ला घ्यावा, त्यानुसार काम करावी असे नाही. ठेकेदार सांगतील त्या पद्धतीने काम चालू आहे. समृद्धी महामार्गाचे जे गाडं घसरत गेलं आहे ते या ठेकेदारांमुळे गेले आहे. ही फक्त श्रेय घेण्याची लढाई सुरु आहे.' असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.