भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी
'नरेंद्र मोदींचं सरकार केंद्रात येईल तेव्हा नारायणराव राणे त्या मंत्रिमंडळात असतील', नारायण राणेंच्या कोकणातील कणकवलीतील सभेत हा विश्वास राज ठाकरेंनी व्यक्त केला होता. पण नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्ममधील मंत्रिमंडळात नारायण राणेंचा पत्ता कट झालाय. त्यामुळं राज ठाकरे जे बोलले त्याच्या नेमकं उलटच घडल्याची चर्चा रंगलीय.
नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. यावेळी त्यांच्यासोबत 48 मंत्र्यांनी शपथ घेतलीय. मात्र महाराष्ट्रातून नारायण राणे आणि भागवत कराड या विद्यमान मंत्र्यांचा नव्या मंत्रिमंडळातून पत्ता कट करण्यात आलाय. नारायण राणे हे मोदींच्या गेल्यावेळच्या सरकारमध्ये सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री होते.
लोकसभा निवडणूकीच्या काळात राज ठाकरे यांनी नारायण राणेंच्या प्रचारासाठी कणकवलीत सभा घेतली. या सभेत राणेंच्या मंत्रिपदाचा धागा पकडून राज ठाकरेंनी बाकावर बसणारा खासदार हवाय की मंत्री होऊन निर्णय घेणारा, असा सवाल उपस्थित करीत राणेंना मंत्रिपद मिळण्याचा विश्वास व्यक्त केला होता.
कोकणातून महायुतीला सर्वाधिक पाच जागा मिळाल्या आहेत. मात्र नारायण राणेंचा पत्ता कापला गेल्यामुळे मोदी सरकारच्या पहिल्या टप्प्यातल्या मंत्रिमंडळात कोकणाला स्थान मिळालेलं नाही. त्यामुळे राणे आपल्या केंद्रातल्या अनुभवातून कोकणातली कामं मार्गी लावणार की राज ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे त्यांच्यावरही केवळ बाकं वाजवण्याची वेळ येणार हे येत्या काळात स्पष्ट होईल.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.