मावळातील अनेक राष्ट्रवादी नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
भेगडे गटाच्या नाराजीचा फायदा घेत भाजपला बळ मिळाले.
अजित पवार यांच्या हस्तक्षेपानंतर नाराज कार्यकर्ते पुन्हा राष्ट्रवादीत परतले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पार्श्वभूमीवर घडामोडींना महत्त्व प्राप्त झाले आहे.
दिलीप कांबळे,मावळ
Maval politics NCP leaders join BJP ahead of elections : मावळ तालुक्यातील राजकारणात नव्या घडामोडींना उधाण आले आहे. अलीकडेच मावळातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्षांतील अनेक नेते, कार्यकर्त्यांनी मुंबईत झालेल्या एका मोठ्या सोहळ्यात भाजपमध्ये प्रवेश केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही घटना राजकीय दृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे.
मावळ मतदारसंघातील विधानसभा निवडणूक ही राज्यातील सर्वाधिक रंगतदार लढतींपैकी एक मानली जात होती. विद्यमान आमदार सुनील शेळके यांना यंदाही राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्याकडून संधी देण्यात आली. मात्र, यामुळे पक्षातील ज्येष्ठ नेते बापूसाहेब भेगडे नाराज झाले. त्यांच्या नाराजीचा फायदा घेत भाजप-शिवसेना व राष्ट्रवादीच्या नाराज गटाने भेगडे यांच्या पाठीशी उभे राहत अपक्ष उमेदवार म्हणून त्यांना पाठबळ दिले. तरीही मतदारांनी आमदार सुनील शेळके यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना तब्बल एक लाखांहून अधिक मतांनी विजयी केले. या निकालानंतर भेगडे गटाचे राजकीय भवितव्य काय, याबाबत चर्चांना उधाण आले.
निवडणुकीनंतर मावळातील राजकीय वर्तुळात ही चर्चा चांगलीच रंगली होती की बापूसाहेब भेगडे यांच्यासह राष्ट्रवादीतील अनेक नेते भाजपमध्ये दाखल होणार. काही कार्यकर्त्यांनी प्रत्यक्षात भाजपमध्ये प्रवेश करून ही चर्चा खरी ठरवली सुद्धा. मात्र, स्वतः भेगडे यांनी तब्येतीची कारण देत प्रवेश टाळला. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः पुढाकार घेत नाराज नेत्यांशी फोनवरून संवाद साधला. “आपण एकत्रित राहून पुन्हा मावळात राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत करू,” असे आवाहन त्यांनी केले. त्यानंतर भेगडे गटातील अनेक कार्यकर्त्यांनी पुन्हा राष्ट्रवादीत परतण्याचा निर्णय घेतला.
मावळ राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी अध्यक्ष बबनराव भेगडे यांनी स्पष्ट केले की, “गेल्या ४० वर्षांपासून पवार साहेब, अजितदादा आणि आता आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आलो आहोत. काही काळ नाराजी असली तरी कार्यकर्त्यांचा विश्वास अजूनही राष्ट्रवादीवर आहे. आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत आम्ही सर्वांना एकत्र करून पुन्हा मावळात राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवू.”
मावळात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, भाजप-शिवसेना युती आणि काँग्रेस या सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपमध्ये गेलेल्या कार्यकर्त्यांमुळे स्थानिक पातळीवर बदल होणार असले, तरी अजित पवार यांच्या सक्रिय हस्तक्षेपामुळे राष्ट्रवादीत पुन्हा जोश निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. राज्याच्या राजकारणात मावळ हा मतदारसंघ नेहमीच चर्चेत राहिला आहे. त्यामुळे येत्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि नंतरच्या विधानसभा निवडणुका या पार्श्वभूमीवर या घडामोडी अत्यंत निर्णायक ठरणार हे नक्की.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.