पुण्यातील खराडी परिसरात धक्कादायक घटना
प्रेमप्रकरणातून २३ वर्षीय कॉम्प्युटर इंजिनीअर तरुणीने आत्महत्या केली
प्रेमप्रकरणातून झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर प्रियकराला अटक
खराडी पोलीस पुढील तपास करत आहेत
सचिन जाधव, पुणे
पुण्यात प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट झाल्याची बातमी समोर आली आहे. इंजिनियर बॉयफ्रेंडच्या जाचाला कंटाळून कॉम्प्युटर इंजिनीअर तरुणीने आत्महत्या केली. याप्रकरणी तिच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी घटनेची गांभीर्यता लक्षात घेऊन तपासाची चक्रे वेगाने फिरवत मृत तरुणीच्या बॉयफ्रेंडला ताब्यात घेतले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जान्हवी पाठक (२३) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. ती मूळची बिहार येथील रहिवासी होती. गेल्या २ महिन्यांपासून ती पुण्यातील खराडी परिसरात राहत होती. पुण्यातील एका नामांकित आयटी कंपनीत ती कॉम्प्युटर इंजिनीअर म्हणून काम करत होती. तिच्या प्रियकराचे नाव अमृतकुमार सिंह असे असून तो नोएडा येथील एका आयटी कंपनीत काम करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांच्या माहितीनुसार, जान्हवी आणि अमृतकुमार हे एकमेकांना आधीपासून ओळखत होते. दोघांचे शालेय शिक्षणही एकत्र झाले होते. पुढे जाह्नवीने राजस्थानमधून इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले आणि नोकरीच्या निमित्ताने पुण्यात आली. दरम्यान, दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. मात्र जान्हवी पुण्यात आल्याने काही काळ दोघांमध्ये दुराव्यामुळे गैरसमज निर्माण झाला होता. या गैरसमजातून दोघांमध्ये वाद वाढले.
अमृतकुमार दोन दिवसांपूर्वी जान्हवीला भेटण्यासाठी नोएडाहून पुण्यात आला होता. गुरुवारी रात्री दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला. हा वाद एवढा वाढला की, दोघांमध्ये मारामारी झाली. त्यानंतर शुक्रवारी सकाळी अमृतकुमार खोलीच्या खाली आला. त्याचदरम्यान जान्हवीने राहत्या ठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. ही घटना शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या ते दीडच्या सुमारास खराडी परिसरातील रिव्हर डेल सोसायटीत घडल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून पुढील तपास सुरू केला.
या प्रकरणी उत्तर प्रदेशात राहणाऱ्या जान्हवीच्या काकांनी खराडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अमृतकुमार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. जान्हवीने नेमक्या कोणत्या कारणातून टोकाचे पाऊल उचलले, तसेच वादामागील संपूर्ण पार्श्वभूमी काय होती, याचा तपास खराडी पोलिस करत आहेत.