पुण्यात भयंकर हत्याकांडाची घटना घडली
दीड वर्षांचा असताना वडिलांची हत्या झाली होती
या हत्येचा बदला २३ वर्षांनंतर तरुणाने घेतला
वडिलांच्या मारेकऱ्याला तरुणाने मित्रांच्या मदतीने संपवलं
राजगड पोलिसांकडून आरोपींना अटक
अवघ्या १.५ वर्षांचा असताना वडिलांची निर्घृण हत्या करण्यात आली आणि याच घटनेचा बदला २३ वर्षांनंतर मुलाने बदला घेतला. वडिलांची हत्या करणाऱ्या आरोपीला मुलानं संपवलं. एखाद्या हिंदी चित्रपटाची पटकथा वाटली असेल ना? मात्र हे असचं घडलंय पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यातील शिंदेवाडी भागात.
२३ वर्षांपूर्वी आपल्या वडिलांची हत्या करणाऱ्याचा बदला घ्यायचा या सुडाच्या भावनेतून मुलाने वडिलांच्या एका मारेकऱ्याची धारधार शास्त्राने वार करत हत्या केली. या प्रकरणी पुणे पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने आणि राजगड पोलिसांनी मंथन वैद्य आणि त्याच्या तीन साथीदारांना अटक केली आहे. या कारवाईत एका आरोपीकडून गावठी पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. पण ही हत्या नेमकी का केली याचं कारण ऐकलं तर तुम्हाला एखादा हिंदी चित्रपट नक्की आठवेल...
मंथन वैद्यचे वडील दिनेश वैद्य हे पुणे शहरात मजुरीचे काम करत होते. या दरम्यान, त्यांची ओळख संजय देशमुख याच्याशी झाली होती. दोघांची मैत्री इतकी घट्ट झाली की दोघं सगळीकडे सोबत असायचे. २००३ मध्ये दोघांमध्ये किरकोळ वाद झाले आणि एकेदिवशी देशमुखने दारूच्या नशेत वैद्य यांची हत्या केली. याप्रकरणी संजय देशमुखवर पुणे शहरातील विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याला अटक झाली. हा सगळा प्रकार एप्रिल २००३ मध्ये घडला.
वडिलांची हत्या झाली तेव्हा मंथन हा अवघ्या १.५ वर्षांचा होता. वडिलांचे छत्र हरवले घरचा आधार गेला मात्र मंथन याच्या आईने मुलाला सांभाळलं. पुण्यातील सदाशिव पेठेत एक खानावळ सुरू करून मंथनची आई उदरनिर्वाह करत होती. मात्र दुसऱ्या बाजूला वडिलांच्या हत्येप्रकरणात कोर्ट कचेऱ्या सुरूच होत्या. या सगळ्या गोष्टीला वैतागून मंथनने वडिलांच्या हत्येला जबाबदार असलेल्या संजय देशमुख याचा काटा काढायचे त्याच वेळा ठरवले होते.
संजय देशमुख याच्यावर एकूण तीन गुन्हे दाखल होते. एप्रिल २०२६ मध्ये जेलमधून जामिनावर सुटलेल्या देशमुखचा काटा काढायचा हे मंथनने ठरवलं होतं. दरम्यान देशमुख आणि मंथनच्या मावशीचा नवरा संदीप कोरी यांची भेट झाली. यावेळी देशमुखला आपला खून करण्यासाठी मंथन प्रयत्न करत असल्याचं समजलं होतं. यामुळे देशमुखने संदीप कोरीला "मंथनला समजावून सांग नाहीतर मी त्याचा गेम करेल अशी धमकी दिली".
११ जुलै रोजी रात्री देशमुख हा पुण्यातील मुंढवा भागातून कात्रजच्या दिशेने निघाला असता मंथनने त्याच्या इतर दोन मित्र आणि संदीप कोरी याच्यासोबत त्याचा पाठलाग करायला सुरुवात केली. मंथनने देशमुखची कार कात्रज बोगद्याजवळ अडवली आणि धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केला. याप्रकरणी राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचा तपास करताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे मंथन दिनेश वैद्य आणि सौरभ सागर परदेशी या दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी मियान गज्जद्दीन शेख आणि संदीप बाबुलाल कोरी यांच्या मदतीने ही हत्या केल्याची कबुली दिली. त्याच जुन्या वैमनस्यातून सूड उगवत ही हत्या करण्यात आल्याचे तपासातून उघड झाले आहे. याप्रकरणातील आरोपी संदीप कोरी याच्यृडून एक गावठी पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध शस्त्र कायद्यानुसार स्वतंत्र गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.