गोरेगावमधील सिद्धार्थनगर अर्थात पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पाला आता आणखी वेग मिळणार आहे. पुनर्विकासातून म्हाडाच्या मुंबई मंडळाला विक्री घटकाअंतर्गत मिळालेल्या भूखंडांवर आधीच २३४३ घरांचे बांधकाम सुरू असताना, आता आणखी दोन भूखंडांवर १४१८ नवीन घरे उभारण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. यासाठी गुरुवारी निविदा प्रक्रिया जाहीर करण्यात आली.
पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प दीर्घकाळ रखडला होता. मात्र मुंबई मंडळाने हा प्रकल्प मार्गी लावत पुनर्वसित इमारतींची कामे पूर्ण केली असून मूळ रहिवाशांना घरांचे वितरण सुरू केले आहे. या पुनर्विकासातून म्हाडाला एकूण नऊ भूखंड विक्रीसाठी उपलब्ध झाले असून, त्यावर सर्वसामान्यांसाठी घरे उभारून सोडतीद्वारे विक्री करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
सध्या आर-१ भूखंडावर ५७२ घरे, आर-४ वर १०२५ घरे, आर-७ वर ५७८ घरे आणि आर-१३ वर २५१ घरे अशा एकूण २३४३ घरांचे बांधकाम सुरू आहे. त्यात आता आणखी दोन भूखंडांची भर पडणार आहे. म्हाडाच्या माहितीनुसार, आर-७/अ-१ या १,३९,५६१.४६ चौ. मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडावर अल्प गटासाठी ५०४ आणि मध्यम गटासाठी ६७७ घरे उभारण्यात येणार आहेत. तर आर-१२/ए या २८,३५५.८५ चौ. मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडावर अल्प गटासाठी १२५, मध्यम गटासाठी ८७ आणि उच्च गटासाठी २५ घरे बांधण्यात येणार आहेत.
दोन्ही भूखंडांवरील घरे सोडतीद्वारे विक्रीसाठी उपलब्ध केली जाणार आहेत. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील काही महिन्यांत प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. आर-७/अ-१ भूखंडावरील प्रकल्प ४८ महिन्यांत, तर आर-१२/ए भूखंडावरील काम ३६ महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे ही घरे २०३० पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. म्हाडाच्या धोरणानुसार, सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पांतील घरांचा समावेश सोडतीत केला जातो. त्यामुळे पुढील एक-दोन वर्षांत या घरांचाही समावेश म्हाडाच्या सोडतीत होण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त करण्यात येत आहे. गोरेगावसारख्या महत्त्वाच्या परिसरात अल्प आणि मध्यम गटासाठी मोठ्या प्रमाणावर घरे उपलब्ध होणार असल्याने घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या इच्छुकांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.