अभिजित देशमुख; साम टीव्ही प्रतिनिधी
कल्याण डोंबिवली महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर अभिनव गोयल यांनी स्पष्ट केले आहे की, नागरीक हा त्यांच्या कामाचा केंद्रबिंदू असणार आहे. नागरीकांना जास्तीत जास्त सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे, त्यांच्या तक्रारींचे वेळेवर निराकरण करणे आणि लोकाभिमुख प्रशासन राबवणे, हेच त्यांच्या कार्यप्रणालीचे मुख्य उद्दिष्ट असेल. विशेषतः आरोग्य व शिक्षण या क्षेत्रांमध्ये सुधारणा करून नागरिकांना दर्जेदार सेवा मिळाव्यात यासाठी ते कटिबद्ध असतील, असे त्यांनी सांगितले.
अभिनव गोयल हे केडीएमसीचे २६वे आयुक्त असून, यापूर्वी ते हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. हिंगोलीत काम करताना त्यांनी आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत सेवा पोहोचविण्यावर विशेष भर दिला होता. कल्याण-डोंबिवली महापालिकेत आयुक्त म्हणून ही त्यांची पहिलीच नियुक्ती असून, या नव्या जबाबदारीबाबत ते उत्साही आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करत असल्याचे दिसते.
पदभार स्वीकारल्यानंतर गोयल यांनी काही अधिकाऱ्यांसोबत तातडीने बैठक घेऊन सुरू असलेल्या विविध कामांची आणि प्रकल्पांची माहिती घेतली. यामध्ये २७ गावांमध्ये राबविण्यात येणाऱ्या अमृत पाणीपुरवठा योजनेचा समावेश होता. ही योजना लवकरात लवकर मार्गी लावण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या नेतृत्वाखाली हे प्रकल्प वेळेत आणि प्रभावीपणे पूर्ण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आयुक्त गोयल हे आयआयटीमधून सिव्हिल इंजिनिअर असून, तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून प्रशासन अधिक कार्यक्षम बनवण्यावर त्यांचा भर आहे. त्यांनी सांगितले की, आजचे युग हे तंत्रज्ञान आणि एआय आधारित आहे, त्यामुळे महापालिकेच्या कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून नागरिकांना सुविधा अधिक जलद आणि प्रभावीपणे कशा देता येतील, याचा विचारही केला जाणार आहे. त्यांच्या नेतृत्वात केडीएमसीच्या कार्यपद्धतीत आधुनिकतेचा स्पर्श होणार असल्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.