परतीच्या पावसानं पिकांचं अतोनात नुकसान
शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला
मुरबाडमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या
फय्याज शेख, मुरबाड | साम टीव्ही
परतीच्या पावसानं हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यानं खचलेल्या आणि शेतीसाठी घेतलेलं कर्ज कसं फेडू या विवंचनेत असलेल्या एका शेतकऱ्यानं आपलं आयुष्य संपवलं आहे. मुरबाड तालुक्यात ही हृदयद्रावक घटना घडली आहे. एका शेतकऱ्यानं विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच तिसऱ्या दिवशी या शेतकऱ्यानं जगाचा निरोप घेतला.
परतीच्या पावसानं शेतीची दैना केली. शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेला. पिकं वाहून गेली. नासधूस झाली. काही शेतकऱ्यांनी तर कर्ज काढून पीक घेतलं. ते जोपासलं. पण या पावसानं ते पीक उघड्या डोळ्यांनी शेतातच आडवं पडलेलं बघितलं. सरकारनं या शेतकऱ्यांच्या वेदनांवर नुकसान भरपाई जाहीर करून फुंकर घालण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत काही शेतकऱ्यांचा धीर सुटला होता. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचीही हीच अवस्था आहे. शेतीचं नुकसान आणि त्यात कर्ज कसं फेडायचं या विवंचनेत असलेल्या मुरबाडमधील जायगाव येथील ५२ वर्षीय रमेश देसले या शेतकऱ्यानं मृत्युला कवटाळलं.
आकारानं अगदी बारीक आणि चविष्ट अशा झिनीच्या तांदळासाठी मुरबाड तालुका ओळखला जातो. येथील शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. बहुतेक शेतकरी वर्षातून एकच पीक घेतो. वर्षभर काबाडकष्ट करून मिळालेल्या उत्पन्नातून आपल्या कुटुंबाला लागेल इतकं धान्य ठेऊन घेतो आणि राहिलेले धान्य विकून त्यातून मिळालेल्या पैशांतून आपल्या कुटुंबाची गुजराण करतो. यावर्षी समाधानकारक पावसामुळे पीक बहरलं होतं. त्यामुळं येथील बळीराजा आनंदी होता. हे पीक कधी एकदा शेतातून खळ्यात येतो आणि खळ्यातून घरात येतो असं झालं होतं. पण परतीच्या पावसानं सगळ्या आशा-अपेक्षांवर पाणी फेरलं.
परतीच्या पावसानं धुमाकूळ घातला आणि त्यात शेतात उभं राहिलेलं, बहरलेलं पीक वाहून गेलं. तर काही ठिकाणी शेतातच ते पीक आडवं झालं. पावसात भिजून ते खाण्यालायक राहिले नसल्याने आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा या विवंचनेत शेतकरी सापडला. मुरबाड तालुक्यातील धसई परिसरातील जायगाव येथील रमेश गणपत देसले यांचंही मोठं नुकसान झालं. पिकांची अवस्था त्यांना बघवली नाही. शेतीचं नुकसान आणि सोसायटीतून घेतलेले कर्ज कसं फेडायचं या विवंचनेत ते होते. त्यांनी पिकांवर फवारणीसाठी आणलेले विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांचा जीव वाचवण्यासाठी कुटुंबीयांनी शर्थीचे प्रयत्न केले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. शहापूर येथील रुग्णालयात अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर तीन दिवसांपासून उपचार घेत असलेले देसले यांची प्राणज्योत मालवली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.