गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये सुरू असलेल्या अपघातांची मालिका थांबण्याचं नाव घेत नाही आहे. आज पुन्हा कल्याण ठाकुर्ली दरम्यान अपघात झाला असून लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसात कल्याण ते ठाणे दरम्यानचा हा चौथा अपघात असून चार जणांनी जीव गमावला आहे. मैनुद्दीन शहा असं आजच्या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली घटना घडली आहे. दरम्यान मृत तरुण लोकलमधून पडला की खांबाला धडकून पडला याचं कारण अद्याप अस्पष्ट असून डोंबिवली रेल्वे पोलिसांकडून तपास सुरू आहे.
दोन दिवसांपूर्वीच मध्य रेल्वेवर एक धक्कादायक प्रकार समोर आला होता. चाकूचा धाक दाखवून प्रवाशांना लुटणाऱ्या आणि मारहाण करणाऱ्यांना विरोध करणाऱ्या एका प्रवाशाचा चाकूने हल्ला करून खून करण्यात आला होता. मध्य रेल्वेच्या खडवली आणि वाशिंद रेल्वे स्थानका दरम्यान लोकलमध्ये 27-28 एप्रिलच्या मध्यरात्री तीन ते चार नशेखोरांनी हा हल्ला केला होता.
या घटनेच्या आदल्याच दिवशी उत्तर प्रदेशातील ३२ वर्षांच्या तरुणाला धावत्या ट्रेनमधून खाली ढकलून देण्यात आलं होतं. लोकलमध्ये भांडण झालं. हे भांडण इतकं विकोपाला गेलं की चौघांनी त्याला ट्रेनमधून ढकलून दिलं. तो ट्रॅकवर पडला. इतक्यात ट्रेनचं चाक त्याच्या हातावरून गेलं आणि त्याचा हात कायमचा निकामी झाला. त्याचा पायही फ्रॅक्चर झाला. सध्या हा तरुण सायन हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. जखमी तरुण आठवडाभरापूर्वीच मुंबईत आयुष्यभराची स्वप्ने घेऊन आला होता आणि ही स्वप्नं एका क्षणात बेचिराख झाली.
३० एप्रिला डोंबिवली ते कोपरदरम्यान २६ वर्षीय रिया राजगोर या तरुणीचा लोकलमधून पडून मृत्यू झाला होता. रियाने कामाला जाण्यासाठी सकाळी ८ वाजताच्या सुमारास प्रवाशांनी भरलेली ट्रेन पकडली. डोंबवलीवरून ट्रेन सुटली आणि रियाचा तोल गेला आणि ती ट्रेनमधून पडली. या घटनेत रियाचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान अपघाताच्या या सततच्या घटनांमुळे लोकलच्या सुरक्षित प्रवासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.