Mumbai News: मुंबईमध्ये शनिवारपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. मुंबईत आता कुठे पावसाला सुरुवात झाली तोवरच भिंत, घर आणि इमारती कोसळल्याच्या घटना घडायला सुरुवात झाली आहे. घाटकोपरच्या (Ghatkopar Home Collapsed) रमाबाई आंबेडकर कॉलनीमध्ये घर कोसळल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये चौघे जण जखमी झाले आहेत. तर ठाण्यामध्ये (Thane Wall Collapsed) ३५ फुटांची भिंत चाळीवर कोसळल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर कॉलनीमध्ये सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास घर कोसळल्याची घटना घडली. या घटनेमध्ये एकाच कुटुंबातील चौघे जण जखमी झाले आहेत. महादेव खिलारे (५० वर्षे), सुनिता खिलारे (४२ वर्षे), रोहित खिलारे (२३ वर्षे) आणि वैभव खिलारे (२० वर्षे) हे जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती स्थिर आहे.
तर ठाण्यातील चिरागनगर परिसरात एका कॉम्पलेक्सची संरक्षण भिंत चाळीवर कोसळल्याची घटना घडली. 35 फूट लांब आणि 8 फूट उंच असणारी ही संरक्षण भिंत शेजारच्या चाळीवर कोसळली. या घटनेत गणेश बेंडकुळे यांच्या घराचे मोठे नुकसान झाले. या घटनेमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिकेचे आपती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.
दरम्यान, मुंबईत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रविवारी विलेपार्ले येथे इमारत कोसळ्याची घटना घडली होती. विलेपार्ले पश्चिमेकडील नानावटी रुग्णालयाजवळ दोन मजली इमारत अचानक कोसळली. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला. तर पाच जणांना ढिगाऱ्याखालून सुरक्षित बाहेर काढण्यात आले. हे पाचही जण जखमी असून त्यांच्यावर कूपर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, मुंबईच्या विद्याविहार पूर्वेला असलेल्या चित्तरंजन कॉलनीत एक दुमजली बंगला आठ ते दहा फूट खचल्याची देखील घटना घडली होती. यामध्ये तीन जणांची सुखरुप सुटका करण्यात आली तर मलब्याखाली दबून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.