राज्यात तापमानात सातत्याने वाढ होत असून उष्णतेची लाट जाणवत आहे
३ ते ५ मे दरम्यान काही जिल्ह्यांत अवकाळी पावसाची शक्यता
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
शेतकऱ्यांना पिके सुरक्षित ठेवण्याचे आवाहन
राज्यात कडाक्याच्या उन्हाने नागरिक हैराण झाले असतानाच आता हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. एप्रिलच्या अखेरीपासून तापमानात सातत्याने वाढ होत असून अनेक ठिकाणी उष्णतेची लाट जाणवत आहे. मात्र आज अनेक जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील काही दिवस हे वातावरण कायम राहणार असून उर्वरित जिल्ह्यांमध्ये उकाडा कायम राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज २ मे रोजी कोकण-गोवा परिसरात अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे किनारपट्टी भागात उष्णतेचा तडाखा काही प्रमाणात कमी जाणवू शकतो. मात्र मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी आकाश निरभ्र राहण्याचा अंदाज असून तापमानात विशेष घट होण्याची शक्यता नाही. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये सकाळच्या वेळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. दुपार आणि संध्याकाळच्या सुमारास आकाश मुख्यतः निरभ्र राहील. कमाल तापमान सुमारे ३३ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २७ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे.
दरम्यान, ३ मेपासून राज्यातील काही भागांत मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, तसेच सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. ३ ते ५ मे दरम्यान राज्यातील विविध जिल्ह्यांत अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. विशेषतः विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता अधिक असल्याचे सांगितले जात आहे. या बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे काढणीस आलेली पिके सुरक्षित ठेवण्याचा सल्ला दिला जात आहे.
भंडारा जिल्ह्यात काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. या नैसर्गिक आपत्तीचा सर्वाधिक फटका तुमसर तालुक्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांना बसला असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाली आहे. विशेषतः तुमसर तालुक्यात या पावसाची चांगलीच हजेरी पाहायला मिळालं. जोरदार वादळी वाऱ्यामुळं शेतातील उभं भातपीक जमीनदोस्त झालं आहे. अनेक ठिकाणी भाताची कापणी सुरू होणार होती, तर काही ठिकाणी पीक लोंब्या भरण्याच्या अवस्थेत होतं. वादळी वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की, अनेक शेतातील डोलणारं उन्हाळी भातपीक पूर्णपणे जमिनीला टेकलं आहे. शेतात पाणी साचल्यानं आता पिकाला मोड फुटण्याची किंवा दाणे काळे पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या अवकाळी पावसामुळं तुमसरमधील शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला असून, आता शासनानं तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.