मुंबई : विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन आमदारांच्या कार्यकर्त्यांच्या हाणामारीमुळे गाजत आहे. आमदारांच्या कार्यकर्त्यांवरील हाणामारीमुळे चहूबाजूंनी टीका केली जात आहे. आमदारांच्या कार्यकर्त्यांच्या हाणामारीचे पडसाद पावसाळी अधिवेशनच्या शेवटच्या दिवशीही उमटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधासभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर दिलं. यावेळी विधीमंडळातून लाथाबुक्क्यांचा संदेश जात असेल तर आपण सगळ्यांनी चिंतन करण्याची आवश्यकता असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.
विधीमंडळातील पावसाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं. अंतिम आठवडा प्रस्तावावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, ' ३० सदस्यांनी या प्रस्तावावर मत व्यक्त केलं. वेगवेगळ्या प्रकारची सूचना आणि काही टीका पण केली. बिझनेस अॅडव्हायझरी कमिटीत बसलो होतो. विरोधी पक्षाकडून काही सदस्यांनी सांगितलं की, अलीकडच्या काळात प्रस्तावात इतके विभाग टाकले जातात की न्याय मिळत नाही. त्यावेळी चर्चा झाली होती की, दोन किंवा चार विभाग असावेत. दुर्दैवानं विरोधी पक्षाकडून जो प्रस्ताव आला, त्यात एकही खातं सोडलं नाही'.
'विरोधी पक्षात काम करण्याची सवय असल्यानं किती खात्यांवर चर्चा उपस्थित करायला हवी, याचं नियोजन करायला हवं. अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यासाठी मी उभा आहे. तेव्हा मी आणि आपल्या सगळ्यांत वेदना आहेत. ज्या घटना अधिवेशनात घडल्या, त्यातून आपण काय संदेश लोकांना देत आहोत. विधानसभा ही आमदार, मंत्र्यांच्या, मुख्यमंत्र्यांच्या, कर्मचाऱ्यांच्या मालकीची नाही. ही विधानसभा महाराष्ट्रातल्या १४ कोटी लोकांच्या मालकीची आहे. विधीमंडळात समाजाला दिशा देण्याचे काम झालं पाहिजे. पण लाथाबुक्क्यांचा संदेश जात असेल तर आपण सगळ्यांनी चिंतन करण्याची आवश्यकता आहे. मी आभार मानतो की, आपण हे प्रकरण गांभीर्याने घेतलं पाहिजे. दोघांनीही खेद व्यक्त केला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
'एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, शब्दातून निघणारं विष असतं, ते रागातून निघणाऱ्या विषापेक्षा जहरी असतं. कटुता निर्माण होणार नाही असा प्रयत्न व्हायला हवा. आपल्या चर्चेचा स्थायीभाव डिस्कशन आणि डिसकोर्स असाच असला पाहिजे. कुणी मीडियासमोर अश्लील घोषणा देताहेत. काही अध्यक्षांविरोधात बोलतात. मॅनेज आहे असं बोलतात. सभागृहानं हे लक्षात घेतलं पाहिजे की, २८८ सदस्यांच्या सभागृहात नियमानं ४५ लक्षवेधी झाल्या पाहिजेत. त्याऐवजी २०० लक्षवेधी करता. तरीही २८८ सदस्यांच्या लक्षवेधी लागू शकत नाही. जी काही भाषा वापरतो, ती योग्य नाही. त्रिभाषा सुत्रावर बरीच चर्चा झाली. तो निर्णय समिती घेईल. निवडून आल्यावर एक त्रिसूत्री शिकली पाहिजे, असेही ते म्हणाले.
कालच्या राड्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'काल जी मारामारी झाली ती खरं म्हणजे कोणासोबत कोण येतंय, यासंदर्भात काही ना काही शिस्त असली पाहिजे. सर्जेराव टकले यांच्यावर सहा गुन्हे आहेत. नितीन देशमुख यांच्यावर ८ गुन्हे आहेत. इतकी गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. असे या ठिकाणी येऊन मारामाऱ्या करतात. ते योग्य नाही. सदस्यांनी देखील निर्णय घेतला पाहिजे'.
'आपण या सभागृहात खूप चांगले बदल केले आहेत. सभागृहाचा चेहरा बदलला आहे. मार्चमध्ये होणाऱ्या विधानसभा सत्रात विनाबिल्ल्याचा दिसला नाही पाहिजे. तुम्ही परवानगी दिली नाही, ते आत कसे येतात. याच्यातल्या एखाद्यानं येऊन दहशतवादी कृत्य केलं तर कोण जबाबदारी घेणार. आमदारांना बिल्ला लावून यायला लागतो. तसं अभ्यांगतांना ओळखपत्र नसेल तर त्याला बाहेर काढलं पाहिजे, असेही फडणवीसांनी सांगितले.
'अनेकांनी खेद व्यक्त केलाय. पण ते करतील की नाही माहीत नाही. अध्यक्षांना हस्तक, एजंट म्हटलं, त्यांच्या वतीने मी दिलगिरी व्यक्त करतो. मी काही बोललो, ते एखाद्या पक्षाला लागू नये. ते दोन्ही पक्षाच्या आमदारांना लागू आहे. संस्था म्हणून आपली इमेज आहे. एक आमदार चुकीचं वागतो, तेव्हा सगळ्यांबद्दलचं मत तयार केलं जातं. कुठेतरी आपण सत्तेचा दुरुपयोग करतो असा संदेश जातो. पत्रकार म्हणाले धक्काबुक्की झाली. हा विषय महत्वाचा आहे. यातनं अतिशय वाईट प्रकारची प्रतिमा गेली आहे. याकडे निश्चितपणे लक्ष देऊ, असे देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.