प्रयागराजमध्ये सुरू असेलल्या कुंभमेळयामध्ये चेंगराचेंगरीची घटना घडली. या घटनेमध्ये १० पेक्षा अधिक भाविकांचा मृत्यू तर अनेक जण जखमी झालेत. या घटनेवरून हळहळ व्यक्त केली जात आहे. चेंगराचेंगरीच्या या घटनेवरून विरोधी पक्ष संतप्त झाला असून ते आता योगी सरकारवर टीका करू लागले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना संताप व्यक्त केला. यासाठी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कुणावर दाखल केला पाहिजे?, असा सवाल केला आहे.
संजय राऊत यांनी प्रयागराजच्या कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, 'प्रयागराजमध्ये येणाऱ्या कोट्यावधी लोकांची सोय कशी करत होते याचे मार्केटिंग सरकार करत होतं. तेथील व्यवस्थेवर लोक खुश नव्हती. जनतेच्या प्रतिक्रिया आम्ही तुमच्या माध्यमातून पाहत होतो. स्वतः गृहमंत्री जेव्हा कुंभमेळ्यात स्नान करून गेले. संरक्षण मंत्री जेव्हा आले तेव्हा तो परिसर सील करण्यात आला असेल. व्हीआयपी लोक जेव्हा जातात त्या वेळेला एक दिवस किंवा त्यापेक्षा जास्त काळ परिसर बंद केला जातो. सामान्य श्रद्धाळूसाठी त्याचा हा परिणाम असेल.'
'आज १० पेक्षा जास्त श्रद्धाळूंचे प्राण गेले. त्यानंतर तातडीच्या बैठका सुरू झाल्या. प्रधानमंत्री लक्ष ठेवून आहेत म्हणजे काय करत आहेत? गृहमंत्री लक्ष ठेवून आहेत म्हणजे काय करत आहेत? ज्यांनी प्राण गमावले ते येणार आहेत का?', असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. तसंच, 'अनेक श्रद्धाळू हे रस्त्यावर झोपून त्यानंतर स्नान करायला गेले आहेत. अशा प्रकारची व्यवस्था केली आहे का? ', असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
'१९५४ साली कुंभ झाला त्याची व्यवस्था पहा. स्वतः देशाचे प्रधानमंत्री पंडित नेहरू यांनी व्यवस्था कशी आहे हे पाहण्यासाठी तो दौरा केला तेव्हाचे मुख्यमंत्री गोविंद वल्लभ पंत हे पूर्ण काळ तिथे उपस्थित होते अशी माझी माहिती आहे. अखिलेश यादव यांच्या काळातील कुंभमेळ्याची व्यवस्था सर्वात उत्तम होती. हे श्रद्धाळू आवर्जून सांगतात. या व्यवस्थापनामध्ये इतर पक्षाच्या लोकांना देखील सहभागी करून घेतलं असतं तर अशी परिस्थिती उद्भवलेली नसती. पण श्रेयवाद आहे. या श्रेय वादातून लोकांना प्राण गमवावे लागले.', अशी टीका देखील संजय राऊत यांनी केली.
तसंच, '१० हजार कोटींपेक्षा जास्त बजेट यासाठी दिलं गेलं पण प्रत्यक्षात १० हजार कोटी दिसत नाहीत. करोना काळातील आमच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. पण कुंभमेळ्यातील १० हजार कोटी कुठे गेले? योग्य प्रकारे व्यवस्थापन केलं असतं तर आजच्यासारखा गुन्हा घडला नसता. यासाठी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कोणावर दाखल करावा? याचे उत्तर आम्हाला द्यावे.' , असे संजय राऊत यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.