राज्यातील ‘लाडकी बहिण’ योजनेवरून शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही योजना घाईघाईत आणण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. अंधारे म्हणाल्या की, सुरुवातीला राज्यातील जवळपास सर्व महिलांना योजनेचा लाभ मिळणार असल्याचे सांगितले गेले. मात्र, नंतर नियमांमध्ये तीन वेळा कपात करण्यात आली आणि सुमारे २६ लाख महिलांना योजनेतून वगळण्यात आले. त्यानंतरही तब्बल ७१ लाख महिलांचे लाभार्थी म्हणून नाव रद्द करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
यावेळी त्यांनी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्यावरही निशाणा साधला. योजनेचे श्रेय घ्यायला पुढे येतात, पण त्रुटी समोर आल्यावर मात्र स्पष्टीकरण देत नाहीत, अशी जोरदार टीका अंधारे यांनी केली. रद्द झालेल्या महिलांचे सुमारे २५५ कोटी ६० लाख रुपये कोण भरपाई करणार? असा सवाल ही त्यांनी विचारला.
अंधारे यांनी पुढे म्हटले की, ही रक्कम सामान्य नागरिकांच्या करातून आली आहे. जर इतर प्रकरणांमध्ये फसवणुकीचे गुन्हे दाखल होतात, तर या प्रकरणात संबंधितांवर गुन्हे का दाखल करू नयेत? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. यासोबतच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनाही त्यांनी लक्ष्य करत, ७१ लाख महिलांचे पैसे का रद्द केले आणि त्याची भरपाई कोण करणार? असा प्रश्न विचारला.