रोहिदास घाडगे, साम टीव्ही प्रतिनिधी
पावसाळी पर्यटनाच्या निमित्ताने अनेक पर्यटक निसर्गाचा आनंद घेण्यासाठी विविध ठिकाणी सहलीला जातात. पावसाळ्यात धबधबे नद्या तलाव ओसंडून वाहत असतात. निसर्गाचा आनंद घेत असताना जर आपण योग्य काळजी घेतली नाही, पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज घेतला नाही तर ती चूक आपल्या जीवावर बेतते. अशीच एक घटना काळू धबधबा येथे घडली आहे.
पुणे आणि ठाणे जिल्ह्याच्या सीमेवरील प्रसिद्ध काळू धबधबा परिसरात ट्रेकिंगसाठी आलेल्या दोन ट्रेकर्सचा पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून जाऊन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृत ट्रेकर्सची नावे रमण अण्णापुरे आणि पवन साठे अशी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या आठवडाभरापासून माळशेज घाट परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे काळू धबधब्यावरून मोठ्या वेगाने पाण्याचा प्रवाह सुरू असून, धबधब्याखालील काळू नदीही दुथडी भरून वाहत आहे. अशा परिस्थितीत ट्रेकिंगसाठी आलेले रमण अण्णापुरे आणि पवन साठे हे दोघे पाण्याच्या प्रवाहात अडकले. पाण्याचा जोर इतका प्रचंड होता की, दोघेही वाहून जाऊन त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर स्थानिक प्रशासन, पोलीस आणि बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम राबवली. शोधकार्यादरम्यान दोघांचे मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे ट्रेकिंग आणि पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, माळशेज घाट परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून २६ जुलैपर्यंत काळू धबधबा परिसरात पर्यटकांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. नागरिकांनी आणि पर्यटकांनी बंदी आदेशाचे पालन करावे तसेच पावसाळ्यात धोकादायक धबधबे, नदीपात्रे आणि ट्रेकिंग स्थळांपासून दूर राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
सतत कोसळणारा पाऊस आणि धबधब्यांतील वाढलेला पाण्याचा वेग लक्षात घेता, कोणताही जीव धोक्यात घालू नये, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.