संजय गडदे, साम टीव्ही
राज्य सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय अधिकृतपणे मागे घेतल्यानंतरही मुंबईतील एका कॉन्व्हेंट शाळेत हिंदी विषय सक्तीचा प्रकार घडत असल्याची तक्रार समोर आलीये. साकीनाका येथील सेंट मेरीज मलंकारा हायस्कूल शाळेत हा प्रकार घडला. इयत्ता तिसरीपासून पाल्याला हिंदी भाषा शिकवायची की नाही, याबाबतचे मत पालकांकडून एका अर्जावर नोंदवून घेतले जात आहे. अशी माहिती ग्लोबल पेरेंट्स टीचर असोसिएशनचे अध्यक्ष रोहित दंडवते यांनी दिली.
काय आहे प्रकरण?
राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी विषय अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे यांच्यासह अनेक भाषा तज्ञांच्या तीव्र विरोधानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला. यानंतर देखील सेंट मेरीज मलंकारा शाळेत हिंदी शिकवण्यासाठी पालकांकडून लेखी संमती फॉर्म भरून घेतले जात आहेत, असा आरोप आहे.
शाळेकडून पालकांना दिलेल्या अर्जात नमूद केलं आहे की, इयत्ता तिसरीपासून हिंदी शिकवणं हे “ऐच्छिक” असलं तरी दर आठवड्याला चार तास हिंदी शिकवले जातील. भाषा कौशल्य वाढवण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त असल्याचा दावा शाळेनं केलाय.
पालकांचा प्रतिसाद
शाळेच्या म्हणण्यानुसार, काही पालकांनीच शाळेकडे हिंदी विषय शिकवण्याची मागणी केली होती. इयत्ता सहावीपासून हिंदी विषय सुरू होत आहे. पूर्वतयारी म्हणून, तिसरीपासून हिंदी भाषा शिकवण्यासाठी शाळा पालकांची प्रतिक्रिया घेत आहे.मात्र, राज्य शासनाच्या आदेशानंतरही अशाप्रकारे हिंदी शिकवण्याचा प्रस्ताव पालकांवर ढकलणं, म्हणजे अप्रत्यक्ष सक्तीच असल्याचा आरोप रोहित दंडवते यांनी केला आहे.
याप्रकरणी भाषा तज्ञ आणि शिक्षण क्षेत्रातील अभ्यासकांनी चिंता व्यक्त केली असून, त्यांनी प्राथमिक शिक्षणात तिसरी भाषा ऐच्छिकच असावी, असं म्हटलं आहे. शासनाने हा निर्णय मागे घेतलेला असताना, काही शाळा अद्याप हिंदी सक्तीचे प्रयत्न करत असल्याने त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.