Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. मुंबई-गोवा महामार्ग गेल्या १८ तासांपासून ठप्प आहे. लांजा तालुक्यातील अंजणारी पुलावरून गॅंस टँकर कोसळल्याने महामार्गावरील (Mumbai Goa Highway) वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली आहे. सद्यस्थितीला महामार्गावर ३ ते ४ किलोमीटर परिसरात अवजड वाहनांच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे. (Mumbai Goa Highway Latest News)
मुंबई-गोवा महामार्गावर गुरूवारी सायंकाळच्या सुमारास एलपीजी गॅंस वाहून नेणाऱ्या टॅंकरचा अपघात झाला. या अपघातात टॅंकर चालकाचा जागीच मृत्यू झाला. या टँकरमध्ये जवळपास २४ ते २५ किलो एलपीजी वायू असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
टँकरमधून वायू गळती होत असल्याने जोखीम वाढली आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गाचा काही भाग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. टँकरमधील वायू गळती रोखण्यासाठी तज्ज्ञांची टीम गोवा आणि उरणमधून घटनास्थळी दाखल होणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान, एलपीजी वायू सुरक्षितरित्या बाहेर काढल्यानंतरच या मार्गावरील वाहतूक सुरळीत होणार आहे. या अपघातामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या मुंबई-गोवा महामार्गावरील मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक शिपोली, पाली, दाभोळे या मार्गावरुन वळवण्यात आली आहे. देवधे, पुनस, काजरघाटीमार्गे प्रवाशांना रत्नागिरीला पोहोचता येणार आहे.
Edited By - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.