संघर्ष गांगुर्डे, कल्याण | साम टीव्ही
कल्याणमधील एका उर्दू माध्यमाच्या शाळेतील चार अल्पवयीन विद्यार्थिनी बेपत्ता झाल्या होत्या. पोलिसांनी अवघ्या ३ दिवसांत बेपत्ता मुलींचा शोध लावला. त्यामुळे पालकांचा जीव भांड्यात पडला. या धाडसी आणि तत्पर कारवाईबद्दल पोलिसांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
२९ जून रोजी उर्दू शाळेतील आठवी इयत्तेतील दोन आणि नववीतील दोन विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी घरातून बाहेर पडल्या होत्या. मात्र, त्या संध्याकाळपर्यंत घरी परतल्या नाहीत. कुटुंबीयांनी नातेवाईक आणि ओळखीच्या व्यक्तींकडे विचारणा केली. बराच शोध घेतला. त्यानंतरही त्यांचा काहीच ठावठिकाणा लागला नाही. अखेर पालकांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात मुली बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.
तक्रार दाखल होताच कल्याणमधील बाजारपेठ पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपासाला वेग दिला. सीसीटीव्ही फुटेज, मोबाइल लोकेशन, कॉल डिटेल्स आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू करण्यात आला. मुलींचा शोध घेण्यासाठी चार विशेष पथके तयार करून विविध दिशांनी तपास सुरू करण्यात आला.
तपासादरम्यान या चारही मुली रेल्वेने राजस्थानकडे जात असल्याची महत्त्वाची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर तत्काळ रेल्वे पोलिसांशी समन्वय साधण्यात आला. पोलिसांच्या तत्परतेमुळे राजस्थानमधील मारवाड रेल्वे स्थानकावर या चारही मुलींना सुरक्षितपणे ताब्यात घेण्यात आले.
यानंतर कल्याण पोलिसांचे विशेष पथक राजस्थानला पोहचले. चारही विद्यार्थिनींना सुखरूप ताब्यात घेऊन परतीचा प्रवास करत आहेत. या चारही विद्यार्थिनी अजमेर येथे जात असल्याची माहिती मिळाली आहे. या संपूर्ण कारवाईची माहिती कल्याण विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक होनमाने यांनी दिली. वेळेवर केलेला तपास, तांत्रिक माहितीचा प्रभावी वापर आणि विविध यंत्रणांशी साधलेला समन्वय यामुळे चारही अल्पवयीन मुलींचा सुखरूप शोध घेण्यात कल्याण पोलिसांना यश आले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलिसांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.