KDMC CANCER HOSPITAL EXCAVATION PUTS TWO DOMBIVLI BUILDINGS AT RISK; 50 FAMILIES EVACUATED Saam Tv
मुंबई/पुणे

Dombivli : डोंबिवलीतील ५० कुटुंबाचे तडकाफडकी स्थलांतर; नेमकं कारण काय? वाचा

Dombivili News : डोंबिवली पूर्वेतील टिळक रोड परिसरात उभारल्या जाणाऱ्या केडीएमसी कॅन्सर हॉस्पिटलच्या खोदकामामुळे दोन निवासी इमारती धोक्यात आल्या आहेत. संरक्षण भिंती कोसळल्यानंतर सुमारे ५० कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

Alisha Khedekar

  • डोंबिवलीतील KDMC कॅन्सर हॉस्पिटलच्या खोदकामामुळे दोन निवासी इमारती धोक्यात

  • खोदकामानंतर दोन्ही इमारतींच्या संरक्षण भिंती कोसळल्या

  • जीवितहानी टाळण्यासाठी ५० कुटुंबांचे तातडीने स्थलांतर

संघर्ष गांगुर्डे, डोंबिवली

डोंबिवली पूर्वेतील टिळक रोड परिसरात उभारण्यात येत असलेल्या केडीएमसीच्या कॅन्सर हॉस्पिटलच्या बांधकामादरम्यान झालेल्या खोदकामामुळे दोन इमारती धोक्यात आल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे सुमारे ५० कुटुंबांना आपली घरे तात्पुरती रिकामी करून इतरत्र स्थलांतरित व्हावे लागले असून, काही कुटुंबांची व्यवस्था हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून संतप्त रहिवाशांनी संबंधित कंत्राटदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कॅन्सर हॉस्पिटलच्या बांधकामासाठी सुमारे ४० फूट खोल खोदकाम करण्यात आले आहे. मात्र, खोदकामादरम्यान आवश्यक सुरक्षाविषयक उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. खोदकामालगत असलेल्या दोन निवासी इमारतींच्या सुरक्षेला यामुळे धोका निर्माण झाला. गुरुवारी एका इमारतीची संरक्षण भिंत कोसळली होती, तर शनिवारी दुपारी दुसऱ्या इमारतीची संरक्षण भिंतही कोसळल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली.

घटनेची माहिती मिळताच केडीएमसी प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. कोणतीही जीवितहानी होऊ नये म्हणून दोन्ही इमारतींमधील रहिवाशांचे तातडीने स्थलांतर करण्यात आले. काही कुटुंबांना जवळील इमारतींमध्ये तर काहींना हॉटेलमध्ये हलवण्यात आले आहे. या घटनेनंतर रहिवाशांनी प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. “गेल्या सहा महिन्यांपासून हे काम सुरू आहे. खोदकामामुळे धोका निर्माण होऊ शकतो, याबाबत आम्ही अनेक वेळा कंत्राटदार आणि महापालिका अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. मात्र कोणतीही ठोस दखल घेण्यात आली नाही. कोट्यवधी रुपये खर्च करून आणि बँकेचे कर्ज काढून आम्ही घरे घेतली. आता बेघर होण्याची वेळ आमच्यावर आली आहे. आमच्या नुकसानीची भरपाई कोण देणार?” असा संतप्त सवाल रहिवाशांनी उपस्थित केला.

स्थानिक नागरिकांच्या मते, कामाच्या ठिकाणी सुरक्षेची योग्य अंमलबजावणी झाली का, यावर देखरेख ठेवणे ही संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी होती. मात्र दुर्लक्षामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान, केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून तज्ज्ञांचा सल्ला घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला जात असल्याचे सांगितले. “या प्रकरणात कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले. आता या घटनेची चौकशी आणि दोषींवर होणाऱ्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या 'जलसा' बंगल्यालाही पावसाचा फटका; घरात साचले पाणी, VIDEO व्हायरल

एकाच कुटुंबातील ५ जण घरातून अचानक गायब; शेवटचं लोकेशन पुणे, पळाले की घातपात? नेमकं काय घडलं?

Maharashtra News Live Update: मुंबई, ठाणे, पालघरला पावसाचा रेड अलर्ट

Railway Booking : रेल्वेचा मोठा निर्णय! १५ मिनिटे आधीही बुक करता येणार कन्फर्म तिकीट; वाचा A to Z माहिती

Petrol Diesel Price Today: 'या' शहरात पेट्रोल ₹८८.६६ तर डिझेल ८४.५६ रुपये; सरकारी कंपन्यांनी दर घटवले का?

SCROLL FOR NEXT