मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार आहेत. मुंबईतील एका कार्यक्रमात वरळीतील बीडीडी चाळ पुर्नविकास योजनेच्या पहिल्या टप्प्यातील ५५६ लाभार्थ्यांना घरांच्या चाव्या दिल्या जाणार आहेत. या कार्यक्रमाला ठाकरे आणि शिंदे यांच्यासहित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही उपस्थिती पाहायला मिळणार आहे. तिन्ही दिग्गज नेते एकत्र येणार असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षांत शिवसेनेत महत्वाच्या घडामोडी घडल्या. या तीन वर्षांत शिवसेना पक्षाचे दोन गट झाले. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे ठाकरे सरकार कोसळलं. शिवसेना फुटीमुळे एकनाथ शिंदे गट आणि ठाकरे गटाचे संबंध ताणले गेले. शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदा एकनाथ शिंदे आणि आदित्य एकाच मचांवर एकत्र येणार आहेत. मुंबईच्या वरळीतील बीडीडी चाळ पुर्नविकास योजनेचा पहिल्या टप्प्यातील लाभार्थ्यांना घरांच्या चाव्या दिल्या जाणार आहेत. त्यासाठी माटुंगा येथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
सरकारी प्रोटोकॉलनुसार स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांना कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं आहे. त्यानुसार आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे १४ ऑगस्ट रोजी एकाच मंचावर दिसतील. तीन वर्षांनंतर दोन्ही गटाचे नेते एकत्र पाहायला मिळतील. कार्यक्रम हा म्हाडाद्वारे माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिर सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लाभार्थ्यांना घरांच्या चाव्यांचं वाटप केलं जाणार आहे.
कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रमुख पाहुणे म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. तसेच या कार्यक्रमासाठी स्थानिक आमदार आदित्य ठाकरे, स्थानिक खासदार अरविंद सावंत यांनाही कार्यक्रमासाठी आमंत्रण देण्यात आलं आहे. बीडीडी चाळ पुनर्विकास योजना गेल्या वर्षांभरापासून चर्चेत आहे. या योजनेचं काम महाविकास आघाडीच्या काळात सुरु झालं. ठाकरे सरकारनंतर एकनाथ शिंदे सरकारच्या नेतृत्वात काम सुरु राहिलं. आता या योजनेचं पहिल्या टप्प्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात पूर्ण झालं. आता याच योजनेच्या श्रेयवादावरून महायुती आणि महाविकास आघाडीत राजकारण रंगलं आहे.
बीडीडी चाळीच्या पुर्नविकास योजनेच्या लाभार्थ्यांना घरांच्या चाव्या वाटपाचं कार्यक्रम १४ ऑगस्ट रोजी होणार आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाला राजकीय महत्व प्राप्त झालं आहे. मुंबईच्या बॉम्बे डेव्हलेपमेंट डिपार्टमेंट अंतर्गत ब्रिटिशांच्या काळात १९२० ते १९२५ पर्यंत इमारती तयार करण्यात आल्या. या इमारती मोडकळीत आल्या होत्या. याच बीडीडी चाळीचा पुर्नविकास होत आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालं आहे. ब्रिटिशांच्या काळात वरळीतील बीडीडी चाळींच्या बांधकामाचा प्रकल्प सर्वात मोठा प्रकल्प मानला गेला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.