Chakan MIDC: राज्यातील प्रमुख औद्योगिक केंद्रांपैकी एक असलेल्या चाकणमधील रस्ते कामगारांसाठी मृत्यूचा मार्ग ठरतायेत. पुणे-नाशिक महामार्गावर म्हाळुंगे ते स्पायसर चौक दरम्यान सॅनी इंडिया कंपनीजवळ अपघातात महिला कामगाराचा मृत्यू झालाय. कंपनीतून घरी परतत असताना ही दुर्घटना घडली. सानवी पांचाळ असं मृत महिलेचं नाव आहे. त्या स्कोडा कंपनीत सुरक्षा विभागात काम करत होत्या.
या अपघातामुळे चाकणमधील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. खड्डे, वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या सुविधांमुळे चाकणमध्ये एका वर्षात तब्बल 399 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. त्यातही दुचाकींचा अपघात होण्याचं प्रमाण जास्त आहे. या गंभीर समस्येकडे एमआयडीसी प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याची तक्रार आहे.
राज्य आणि केंद्राला हजारो कोटींचा महसूल देणाऱ्या औद्योगिक परिसरातील कंपन्यांनी तातडीने रस्ते दुरुस्तीची मागणी केली आहे. उद्योगनगरी म्हणून ओळख असलेल्या चाकणमधील रस्त्यांच्या दुरवस्थेचा फटका उत्पादन क्षमतेलाही बसतोय.
पावसात खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहनचालकांना अंदाज येत नाही. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. दुसरीकडे अवजड वाहनांची वर्दळ आणि संथ वाहतूक यामुळे स्थानिकांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. मात्र हे केवळ चाकणमध्ये घडतंय असं नाही. भिवंडीत खड्ड्यांमुळे महिलेसह एका जवानाचा बळी गेलाय. तर नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे अपघात होऊन पाच जणांचा मृत्यू झालाय. रस्ते मृत्यूचे सापळे बनत असताना प्रशासन ढिम्म आहे. यंत्रणेला कधी जाग येणार ? हाच खरा प्रश्न आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.