मुंबई : इयत्ता अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी येणाऱ्या सर्व अडचणी दूर करण्यात येत आहे. या नोंदणी प्रक्रियेच्या पहिल्या फेरीमधील नोंदणीमध्ये १ जून रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत अखेर १० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असल्याची माहिती सहसंचालक डॉ. श्रीराम पानझाडे यांनी दिली आहे.
प्रवेश प्रक्रियेतील पहिली फेरी सुरू झाल्यानंतर संपूर्ण राज्यातून विद्यार्थी नोंदणी करत आहे. संकेतस्थळावर ताण येत असल्याने थोड्या प्रमाणात संकेतस्थळ संथ गतीने चालणे, तसेच प्रवेश शुल्क भरण्यामध्ये अडचणी, कॉलेज पसंतीक्रम भरण्यामध्ये अडथळे येणे अशा अडचणी निदर्शनास आल्या. याबाबींवर संबंधित कंपनीमार्फत तत्काळ पर्यायी व्यवस्था करुन प्रक्रिया सुरळीत राहण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत.
विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेचा नोंदणी अर्ज भरण्याकरिता दिनांक २६ मे २०२५ ते ३ जून २०२५ पर्यंतचा एकूण नऊ दिवसांचा पुरेसा कालावधी देण्यात आला आहे. या फेरीची तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर कोणत्याही विद्यार्थ्याची तक्रार असल्यास अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्यापूर्वी प्रत्येक तक्रार दूर केली जाईल, अशी माहिती विभागाने दिली. ही सर्व प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडली जात आहे. यामध्ये कोणत्याही विद्यार्थ्याने काळजी करू नये, असे आवाहन करण्यात आलंय.
अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावरील काही बदल, नवीन पर्याय समाविष्ट करणे आवश्यक असल्याने त्याबाबतचे काम सुरू होते. यादरम्यान क्षेत्रीय स्तर आणि तज्ज्ञांकडून प्राप्त होणारे बदल यामुळे संकेतस्थळ तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण करण्यासाठी काही कालावधी लागला. त्यामुळे प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. त्या वेळापत्रकानुसार २१ मे २०२५ पासून प्रत्यक्ष विद्यार्थी नोंदणी सुरू करणे शक्य झालेले नाही. यानंतर संकेतस्थळाबाबत तांत्रिक अडचणी दूर करुन २६ मे रोजीपासून विद्यार्थी नोंदणी सुरू करण्यात आली. या बदलाबाबत संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक, पुणे) यांनी स्पष्टीकरण देखील दिलेले आहे.
विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींचे निवारण करण्यासाठी विभागस्तरावर मार्गदर्शन केंद्र, हेल्पलाईन नंबर, सपोर्ट डेस्क, तांत्रिक सल्लागार,संकेतस्थळावर मराठी आणि इंग्रजी भाषेमधील माहिती पुस्तिका, प्रश्न-उत्तरे, विद्यार्थी युजर मॅन्युअल, ‘करीअर पाथ’चा टॅब उपलब्ध करुन देण्यात आलाय. तसेच विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये विद्यार्थ्यांस काही बदल करावयाचा असल्यास ग्रीवन्सचा टॅब उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. विद्यार्थी/ पालक यांच्यासाठी विभाग स्तरावर/ जिल्हा स्तरावर अधिकारी/ कर्मचारी यांचे संपर्क क्रमांक संकेत स्थळावर देण्यात आलेले असल्याचेही विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.
सन २०२५-२६ पासून संपूर्ण राज्यात प्रवेश प्रकिया राबविण्यात येणार आहे. यामध्ये ९३४२ कनिष्ठ महाविद्यालयांमधून २० लाख ८८ हजारांहून अधिक विद्यार्थी प्रवेश क्षमता उपलब्ध झाल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.