Uddhav Thackeray : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर दिल्लीमधील कथित घोटाळ्याप्रकरणी कारवाई सुरू आहे. यावरून देशातील ९ विरोधी नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. याच पत्राचा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांनी देखील भाजप नेत्यांना खोचक प्रश्न विचारला आहे. चौकशी सुरू असलेले नेते तुमच्या पक्षात आले तर ते शुद्ध होणार का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे. (Latest Political News)
कसबा पोटनिवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्यावर महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर आज उद्धव ठाकरेंच्या भेटीला आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली आहे. 'आम्ही काही दिवसांपूर्वी पत्र लिहिले आहे. ज्यांची चौकशी लावली ते तुमच्या पक्षात आले तर शुद्ध होतील का? जनतेच्या मताचा बुलडोजर तुमच्यावर चालवावा लागेल. मुंबईत पाहिले त्यांनी खोक्याचा शिमगा केला आता लोक खोक्यांची होळी करत आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
राज्यात शेतकरी कांद्याला भाव नसल्याने मेटाकुटीला आलेत. तसेच त्यांच्यासमोर अवकाळी पाऊस अशा अनेक समस्या उभ्या आहेत. त्यावरून सध्या राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या घडामोडीवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ' वेगळे विषय काढून लक्ष भटकवले जात आहे. त्यामुळे जनतेचे जीवन मरणाचे प्रश्न बाजूला राहतात. तात्काळ पंचनामे ही सरकारी भाषा आहे. ती करावी लागेल पण ती मदत पोहचते का हे देखील पाहिले पाहिजे. माझ्यावर घरून कारभार करतो असा आरोप करण्यात आला. पण त्यावेळी मदत पोहचली होती. आता तुम्ही जा बांधाबांधावर आणि करा पाहणी, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
रविंद्र धंगेकर यांच्या विजयावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की,'धंगेकर पराक्रम गाजवून आले. ते पूर्वी पुण्याचे नगरसेवक होते. मला आनंद आहे की, माझा माणूस आमदार झालाय.या निवडणुकीने दाखवले की काँग्रेस,राष्ट्रवादी सोबत होती. या निवडणुकीने जॅार्ज फर्नांडीस यांच्या निवडणुकीची आठवण करून दिली आहे, असं देखील उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.