नंदुरबारच्या आदिवासी पाड्यातून आलेल्या सुहास वसावे यांनी MPSC राज्यात नववा क्रमांक मिळवला
कोरडवाहू शेतकऱ्याच्या मुलाने परिस्थितीवर मात करून मिळवलं यश
सध्या सहाय्यक प्रकल्प अधिकारी
आता सहाय्यक राज्यकर आयुक्त पदावर निवड
सुहास यांची जिद्द आणि सातत्य महाराष्ट्रातील तरुणांसाठी प्रेरणादायी उदाहरण
सागर निकवडे, नंदुरबार
नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातून आलेल्या एका जिगरबाज तरुणाने आपल्या अथक परिश्रमाच्या बळावर महाराष्ट्राच्या स्पर्धा परीक्षांच्या जगात एक नवा आणि प्रेरणादायी अध्याय लिहिला आहे. मोलगी परिसरातील सोराचापडा या छोट्या आदिवासी पाड्यावर राहणाऱ्या सुहास धरमसिंग वसावे या तरुणाने, अत्यंत बिकट आर्थिक परिस्थितीतून मार्ग काढत, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेत एसटी प्रवर्गातून राज्यात नववा ९वा क्रमांक मिळवत दैदिप्यमान यश संपादन केले असून त्यांची सहाय्यक राज्यकर आयुक्त पदावर त्याची नियुक्ती होणार आहे सुहास वसावेच्या या यशाने सातपुड्याच्या कुशीत आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सुहास वसावे यांचे वडील धरमसिंग वसावे हे कोरडवाहू शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. वडिलांच्या संघर्षातून प्रेरणा घेत सुहासने आपला शिक्षणाचा प्रवास खडतर परिस्थितीतून पूर्ण केला. त्यांनी १० वी पर्यंतचे शिक्षण सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय, कन्नड जि. संभाजीनगर येथून पूर्ण केले, तर १२ वीचे शिक्षण नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथील न्यू हायस्कूलमधून घेतले.
यानंतर जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून त्यांनी बीए अर्थशास्त्र या विषयात पदवी पूर्ण केली. विशेष म्हणजे, या विषयात त्यांनी विद्यापीठात सुवर्णपदक प्राप्त करून आपली शैक्षणिक गुणवत्ता यापूर्वीच सिद्ध केली होती. २०१५ पासून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू करणाऱ्या सुहासने यापूर्वीही आपल्या मेहनतीच्या बळावर शासकीय सेवेत स्थान मिळवले आहे. २०१७ साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत त्यांची उपशिक्षणाधिकारी म्हणून निवड झाली होती. २०१८ साली त्यांना सहाय्यक प्रकल्प अधिकारी म्हणून नियुक्ती मिळाली. २०२२ पासून ते प्रकल्प कार्यालय, अहेरी जि. गडचिरोली येथे सहाय्यक प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
शासकीय सेवेत कार्यरत असतानाही सुहास वसावे यांनी आपला अभ्यास आणि ध्येय सोडले नाही. प्रशासकीय सेवेत उच्च स्थान मिळवण्याचे त्यांचे स्वप्न होते, जे त्यांनी अथक परिश्रम आणि सातत्याने पूर्ण केले. सातपुड्याच्या कुशीत जन्मलेल्या या हिऱ्याने आता प्रशासकीय सेवेत उच्च स्थान मिळवून आपल्या समाजाचा आणि जिल्ह्याचा गौरव वाढवला आहे.
सुहास वसावे यांचे हे यश अनेक तरुणांना प्रेरणा देणारे आहे. हे यश सिद्ध करते की, योग्य दिशा, कठोर मेहनत आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर कोणतीही आर्थिक किंवा भौगोलिक अडचण यशाच्या मार्गात बाधा आणू शकत नाही. आदिवासी पाड्यातून आलेल्या या तरुणाने परिस्थितीवर मात करत मिळवलेल्या या दैदिप्यमान यशामुळे नंदुरबार जिल्ह्याच्या आदिवासी भागातील तरुणांसाठी आशेचा एक नवा किरण निर्माण झाला आहे.
१२वी नंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास चालू केल्यामुळे परीक्षेचे स्वरूप समजून घेणे आणि परीक्षा पास होण्यासाठी आवश्यक कौशल्ये पदवीच्या शिक्षणात शिकण्याचा प्रयत्न केला.या प्रवासात आदिवासी विकास विभागाच्या वसतिगृहाची महत्वाची भूमिका होती. वसतिगृहात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या ८ ते १० मित्रांचा खूप चांगला गट होता.एकमेकांच्या सहकार्याने पहिल्याच प्रयत्नात परीक्षा पास होणं शक्य झाल.आदिवासी विकास विभागात काम करतांना आश्रमशाळांना भेटी देणं,वेळ भेटेल तेव्हा विद्यार्थ्यांना शिकवणे या गोष्टीमुळे वर्ग १ पदासाठी अभ्यासाला प्रोत्साहन मिळाले. या प्रवासादरम्यान कुटुंब, मित्रमंडळी आणि कार्यालयीन सहकारी यांची वेळोवेळी मदत झाली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.