सोलापूर : राज्यात अतिवृष्टी झाल्याने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतातील पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी देखील आर्थिक संकटात सापडला आहे. हातात उत्पन्न येणार नसून घेतलेले कर्ज कसे फेडायचे हाच मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. यातून टोकाचा निर्णय घेत आत्महत्येसारखे पाऊल उचलत आहेत. अशी घटना सोलापूर जिल्ह्यात घडली असून नुकसानग्रस्त शेतकऱ्याने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील कारी गावातील रहिवासी उमेश रमेश विधाते (वय ३६) असे आत्महत्या करणाऱ्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. दरम्यान राज्यात मागील महिन्यात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे शेतकरी शिवारात पाणीच पाणी साचल्याने शेतातील पिके पूर्णपणे उध्वस्त झाले आहेत. काही शेतकऱ्यांच्या शेतातील पिके पाण्यामुळे पूर्णपणे नष्ट झाल्याने उत्पन्न शून्य आहे. यामुळे करावे तर काय? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.
खरीप हंगामाच्या सुरवातीला शेतीसाठी कर्ज घेतले होते. मात्र अतिवृष्टीमुळे शेतातून उत्पन्न मिळणार नसल्याने डोक्यावर असलेले कर्ज कसे फेडायचे याची चिंता शेतकऱ्याला आहे. याच विवंचनेत कारी गावातील उमेश विधाते या शेतकऱ्याने विषारी औषध घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानामुळे सोबतच कर्जबाजारीपणामुळे या शेतकऱ्याने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले.
पंधरा दिवसातील दुसरी घटना
घटना लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यास बार्शीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी व एक वर्षाचे मूल आहे. पुढील तपास पांगरी पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. दरम्यान अतिवृष्टीने झालेल्या नुकसानामुळे आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून १५ दिवसांमध्येच बार्शी तालुक्यातील कारी येथे शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची दुसरी घटना आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.