मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राजकीय पटलावर रणधुमाळी घालणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी (Rajyasabha election) आज शुक्रवारी मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली. महाविकास आघाडीसह भारतीय जनता पक्षाने (BJP) ही निवडणूक जिंकण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली. आज दुपारी ३.३० वाजेपर्यंत विधानसभेच्या २८५ सदस्यांनी मतदान केले. त्यानंतर पाच वाजता मतमोजणीला सुरुवात होणार होती. परंतु, भाजपने ऐनवेळी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतल्यामुळे मतमोजणीला विलंब झाला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी संताप व्यक्त केला आहे.
राऊत यांनी राज्यसभा निवडणुकीच्या निकालाबाबत ट्विट करत म्हटलं, राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी का व कोणी थांबवली आहे ? ईडीचा डाव फसला! आता रडीचा डाव सुरू झाला!! आम्हीच जिंकू! जय महाराष्ट्र!! असं म्हणत राऊतांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. तसंच हरियाणातील राज्यसभा निवडणुकीसंदर्भात अजय माकन यांनीही ट्विट करत भाजपवर टीका केली होती.
भाजपने खालच्या दर्जाचे राजकारण करत राज्यसभेची मतमोजणी रोखून धरली आहे, अशा माकन यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यानंतर संजय राऊथ यांनीही त्यांच्या ट्विटला रिप्लाय देत म्हटलं, महाराष्ट्रातही हाच खेळ सुरु आहे. खालच्या दर्जाचे राजकारण, अशा ट्विट करत राऊतांनी विरोधकांवर निशाणा साधला.
दरम्यान, शिवसेनेचे संजय पवार (Sanjay Pawar) आणि भाजपचे धनंजय महाडीक (Dhananjay mahadik) हे राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी आमने-सामने आहेत. त्यांच्यात चुरशीची लढत होणार असल्याच्या चर्चाही होत्या. मात्र, हे दोन्ही उमेदवार कोल्हापूरचेच असल्याने कुणीतरी एक कोल्हापुरचा खासदार होणार, याचा आनंद संभाजीराजे यांनी व्यक्त केला आहे. कोल्हापुरच्या दोन पैलवानांची कुस्ती रंगतदार सुरु आहे. मला आनंद आहे, कोल्हापुरचाच खासदार होणार, अशी प्रतिक्रिया संभाजीराजे यांनी नुकतीच दिली आहे.
Edited By - Naresh Shende
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.