रणजीत माजगांवकर, साम टीव्ही
कोल्हापूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 'ड्रीम प्रोजेक्ट' मानल्या जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गावरून आता कोल्हापूर जिल्ह्यातील सत्ताधारी शिवसेनेतच मतभेद उघड झाले आहेत. शक्तीपीठ महामार्गाची अलाइनमेंट बदलल्यानंतरही करवीर आणि राधानगरी तालुक्यातील शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे. याच मुद्द्यावरून शिवसेना (शिंदे गट) आमदार चंद्रदीप नरके आणि राजेश क्षीरसागर यांच्यात आता शाब्दिक संघर्ष रंगला आहे.
शक्तीपीठ महामार्गावरून आता शिंदे यांच्या शिवसेनेतच वाद सुरू झाला आहे. दोन आमदार आमनेसामने आले आहेत. करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांनी शक्तीपीठ महामार्गाला कडाडून विरोध केला आहे. त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन हा महामार्ग करवीर मतदारसंघातून जाऊ नये, अशी मागणी केली आहे. अठरा गावांतील शेकडो एकर सुपीक जमीन या प्रकल्पामुळे बाधित होणार असून शेतकरी उद्ध्वस्त होतील, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
दरम्यान, या भूमिकेवर प्रतिक्रिया देताना कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी, “विरोधक शक्तीपीठाला विरोध करत आहेत म्हणून सत्ताधारी आमदारांनी आणि लोकप्रतिनिधींनीही विरोध करणे योग्य नाही,” असे स्पष्ट केले आहे. तसेच “मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आमदार चंद्रदीप नरके यांची ही भाषा खपवून घेणार नाहीत,” असा इशाराही त्यांनी दिला. यापूर्वी कोल्हापूर शहर हद्दवाढीच्या मुद्द्यावरही नरके यांनी विरोधाची भूमिका घेतली होती, मात्र मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी भूमिका बदलली होती, याची आठवणही क्षीरसागर यांनी करून दिली. कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्ग होणारच, असा दावा त्यांनी केला आहे.
एकीकडे महाविकास आघाडीचे नेते शक्तीपीठ महामार्गाला विरोध करत असताना, आता सत्ताधारी शिंदे गटातील आमदारांमध्येच या प्रकल्पावरून उघड मतभेद समोर येत आहेत. त्यामुळे आगामी काळात या महामार्गावरून कोल्हापूरचे राजकारण अधिक तापण्याची चिन्हे आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.