राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचं एनडीएमध्ये विलीनीकरण होणार असल्याच्या चर्चांवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलीये. अशा प्रकारच्या बातम्या आणि अफवा पसरवणं ही भाजपची राजकीय कार्यपद्धती असल्याचा आरोप त्यांनी केला.
संजय राऊत म्हणाले, "महाराष्ट्रात सातत्याने अशा अफवा पसरवल्या जात आहेत. आमचे सहा खासदार पक्ष सोडून गेले. ते पैशांच्या जोरावर शिंदे गटाने फोडले असून ते गद्दार आहेत. रोज 'आमदार फुटणार', 'पक्ष फुटणार' अशा बातम्या पसरवल्या जातात. मात्र काल मातोश्रीवर झालेल्या बैठकीला आमचे सर्व आमदार उपस्थित होते."
ते पुढे म्हणाले, "शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एनडीएमध्ये जाईल किंवा त्यात विलीन होईल, ही शक्यता मला अजिबात वाटत नाही. मी त्यांच्या विचारसरणीला जितकं ओळखतो, त्यानुसार ही गोष्ट पूर्णपणे अशक्य आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं आणि देशात इंडिया आघाडीचं राजकीय भविष्य उज्ज्वल दिसत आहे."
एकनाथ शिंदे यांच्या राजकीय भूमिकेवरही राऊत यांनी टीका केली. "शिंदे स्वतःचा पक्ष भाजपपेक्षा मोठा करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे थेट देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी आव्हान आहे. त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा इतकी वाढली आहे की, भविष्यात ते नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनाही आव्हान देतील," असा दावा त्यांनी केला.
शिंदे यांच्या राजकारणावर टीका करताना राऊत म्हणाले, "हे राजकारण आता पेटी किंवा खोकेपुरतं राहिलेलं नाही, तर कंटेनर आणि गोडाऊनपर्यंत पोहोचलं आहे. महाराष्ट्रासह इतर भागांतून जमा होणारी संपत्ती राजकारणात वापरली जात आहे. या आर्थिक ताकदीसमोर देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांनाही टिकाव लागणार नाही. कोणतीही किंमत मोजून मुख्यमंत्री होण्याचा शिंदेंचा प्रयत्न आहे. त्यासाठी दिल्लीतही ते राजकीय किंमत मोजण्यास तयार असून त्यातील ५० टक्के किंमत त्यांनी आधीच मोजली आहे. या आर्थिक ताकदीमुळे देवेंद्र फडणवीस हतबल झाल्याचं दिसत आहे. भाजपनेच हा भस्मासूर निर्माण केला असून तो एक दिवस फडणवीस आणि अमित शहा यांच्या मानेवर बसेल."
आमदार फुटण्याच्या चर्चांवर राऊत म्हणाले की, काल शिवसेनेच्या २० पैकी १९ आमदारांनी मातोश्रीवरील बैठकीला हजेरी लावली. परभणीचे आमदार जिल्हा बँकेच्या निवडणुकीमुळे उपस्थित राहू शकले नाहीत. या बैठकीत राम मंदिरातील कथित गैरव्यवहार आणि लुटीच्या मुद्द्यावर पक्षाने घेतलेल्या भूमिकेचे सर्व आमदारांनी स्वागत केल्याचं त्यांनी सांगितलं.
या विषयावर राज्यभर आंदोलन करण्यात येणार असून उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांत जाऊन जनतेशी संवाद साधणार आहेत. या दौऱ्याची सुरुवात नागपूरपासून होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी महिला डॉक्टर आणि नर्सला मारहाण केल्याच्या घटनेवरही राऊत यांनी संताप व्यक्त केला.
ते म्हणाले, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे असलेल्या गृहमंत्री पदाची पूजा करावी. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर सत्यनारायणाची पूजा करून त्या पाटावर गृहमंत्री पद ठेवावं. कोरोना काळात पांढऱ्या कोटातील डॉक्टर आणि नर्सेस यांनी अनेकांचे, तुमचेही प्राण वाचवले. आज त्यांच्यावरच हल्ले होत आहेत. कल्याण-डोंबिवलीतील गुंड टोळीचे म्होरके डॉक्टर आणि महिला नर्सवर हात उचलत आहेत. एका राजकीय पक्षाचे नगरसेवक महिलांवर हात टाकत आहेत आणि डॉक्टरांना मारहाण करत आहेत."
राऊत यांनी पुढे सरकारला आव्हान देत म्हटलंय की, "गृहमंत्री पदाची पूजा करण्यापेक्षा महिला डॉक्टर आणि नर्सवर हात उचलणाऱ्यांच्या हातात बेड्या ठोका आणि त्यांची रस्त्यावरून धिंड काढा."
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.