सातारा : विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची आणि मनसेची धूळधाण झाल्यानंतर आता ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची भाषा केली आहे. महाराष्ट्राच्या हितापुढे आमची भांडणं, वाद क्षुल्लक असल्याचं राज ठाकरे एका मुलाखतीत म्हणाले. राज यांनी साद घातल्यानंतर उद्धव ठाकरेंनी सकारात्मक प्रतिसाद दिला. मी सोबत येण्यास तयार आहे. माझ्याकडून सगळी भांडणं मिटली. पण माझी एक अट आहे. माझ्यासोबत येऊन हित आहे की भाजपसोबत जाऊन हित आहे, ते आधी ठरवा, असं उद्धव ठाकरे कामगार सेनेच्या मेळाव्यात म्हणाले. याचदरम्यान, आता या चर्चांवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीबाबत अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, 'ते एका कुटुंबातले आहेत, एका परिवारातले आहेत. त्यांनी त्यांच्यासंदर्भात काय करावं, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. याच्यात आपण नाक खुपसायचं काय कारण?' यामुळे मुंबईतलं राजकारण बदलणार असल्याचं पाहायला मिळेल का? असा प्रश्न विचारला असता, 'तुम्हाला अडचण काय आहे? तुम्हाला काय त्रास होणार आहे?' असा उलट सवाल त्यांनी पत्रकारांना विचारला. 'प्रत्येकाला निर्णय घेण्याचा अधिकार आहे. हा अधिकार असताना राज ठाकरे देखील काम करतात आणि उद्धव ठाकरे देखील काम करतात. त्याच्यामुळे त्यांच्या पक्षाच्या संदर्भात काय भूमिका घ्यावी, हा त्यांचा १०० टक्के अंतर्गत प्रश्न आहे.'
'काही वर्गाला शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षातील जो घटक आहे, त्यांना वाटतं की दोघांनी एकत्र यावं. परंतु, आपण त्यांनी एकत्र यावं? की ना यावं? हे आम्ही किंवा कुठल्या राजकीय पक्षाने सांगण्याचं काही कारण नाही. माझं त्याबद्दल एवढंच म्हणणं आहे की, प्रत्यकानं आपल्या सदसद्विवेक बुद्धीला स्मरून जे त्यांना योग्य वाटत असेल, त्यांनी तो निर्णय घ्यावा', असं अजित पवार म्हणाले आहेत.
बाळासाहेब ठाकरेंच्या AI भाषणाबद्दल अजित पवार काय म्हणाले?
'आर्टीफिशयल इंटेलिजन्सने (AI) याचा वापर झाल्यानंतर या गोष्टी येणारच आहेत, याचा उल्लेख मी आत्ताच भाषणात केला. परंतु जनतेला माहितीय की, बाळासाहेब ठाकरे आपल्यातून कधी निघून गेले. आता या नवीन टेक्नॉलॉजीचा वापर सर्वच वेगवेगळ्या पद्धतीने करताय. मग कितीतरी लोकं ते याआधी कोणत्या पक्षात होते, तेव्हा त्यांनी कुणावर टीका केलेली असते, ते दाखवत बसतात. लोकांना माहितीय की, त्यावेळी त्यांची विचारधारा वेगळी होती, त्यांचा पक्ष वेगळा होता, त्यांचा नेता वेगळा होता, त्यांची भूमिका वेगळी होती, आजच्या घडीला ती व्यक्ती काय करतेय? ते महत्त्वाचं आहे,' असंही अजित पवारांनी सांगितलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.