rain alert issued for nineteen states : महाराष्ट्रात मान्सून रखडला आहे. तर देशातील काही राज्यांत प्रचंड उकाडा जाणवत असताना, मान्सूनची बिहार-झारखंडसह अनेक राज्यांत प्रगती दिसून येत आहे. त्याचवेळी हवामान विभागानं दिलासादायक अंदाज वर्तवला आहे. कोकण-गोव्यासह १९ राज्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. काही ठिकाणी तर वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाटही असेल. या काळात ५० ते ७० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याचीही शक्यता आहे.
पश्चिम बंगाल म्हणजेच उप-हिमालयाचा भाग दार्जिलिंगपासून कूच बिहारपर्यंत, तसेच सिक्कीममधील नागरिकांना सतर्क राहावं लागणार आहे. हवामान विभागानं या भागात पुढील ८ ते ४८ तासांत मुसळधार पाऊस कोसळेल, अशी शक्यता व्यक्त केली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २३ जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्र, तेलंगणा, ओडिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगडमधील काही भागांत पुढे सरकण्याची शक्यता आहे. तर ईशान्येकडील अनेक राज्यांत पुढील आठवड्यापर्यंत मुसळधार पावस कोसळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातील काही भागात २० ते २४ जून या कालावधीत खोल समुद्रात न जाण्याचा सल्लाही दिला आहे.
कोकणसह गोवा, पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, ओडिशा, बिहार, झारखंड, केरळ आणि कर्नाटकातील काही भागांत पुढील काही दिवसांत दमदार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तर राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंड, ओडिशा, बिहार, तेलंगणा आणि दक्षिण भारतातील काही भागांत ५० ते ८० किलोमीटर प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, २० ते २२ जून या काळात दिल्लीत वादळी वाऱ्यांसह हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल. उद्या २० जून रोजी वादळी वाऱ्यांसह हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. तर ६० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील. दिल्लीत २१ जूनपर्यंत अंशतः ढगाळ वातावरण राहील. २२ जूनला देखील हीच परिस्थिती असेल. वादळी वारे किंवा पाऊस होण्याची शक्यता कमी आहे.
एकीकडे पुढील ८ ते ४८ तासांत १९ राज्यांमधील काही भागांत पावसाचा अलर्ट दिला असला तरी, बिहारमधील काही भागांत १९ ते २२ जून या दरम्यान उष्णतेच्या लाटेची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील उत्तरेकडील जिल्ह्यांत १९ ते २४ जून या काळात उष्णतेची लाट असण्याची शक्यता आहे. कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही प्रचंड उष्णता जाणवेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.